मुंबई : देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमिक्राॅनचा संसर्ग वाढला असून अनेक राज्यांमध्ये मिनी लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर शनिवारी महाराष्ट्र सरकारानेही नवे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Confusion over SSC and HSC exams in Omikran crisis, medical exams postponed)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या वर्षी १० वी, १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षांबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. महाराष्ट्र शासनाने शनिवारी जाहीर केलेल्या नवीन गाईडलाईननुसार केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार आहे. देशभरात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तिसऱ्या लाटेचे सावट दहावी-बारावीच्या परीक्षांवर निर्माण झाले आहे.
ओमिक्राॅनच्या वाढत्या केसेस लक्षात घेता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यात अनेक बाधित रुग्णांनी कोविडच्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यामुळे भविष्यात करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यास प्रत्यक्ष परीक्षा होऊ शकत नसल्यास कोणत्या पद्धतीने मूल्यमापन करता येईल याचा विचार आधीच करायला हवा. तसेच दुसऱ्या पर्यायाचा विचार करायला हवा, अशी मागणी शिक्षक आणि पालकांमधून होत आहे.
ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारीपासून सुरू होणार होत्या. तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा २८ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारीपासून सुरू होणार होत्या.