मुंबई: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला आहे. सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून स्पष्ट केली. यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आता मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. मराठी माणूस भावनिक आहे का तर हो.. मराठी माणूस नक्कीच 100 टक्के भावनिक आहे. पण तो मूर्ख नाही आहे, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री यांच्या भाषणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/3aFrdAwLSj — Timesnowmarathi (@timesnowmarathi) June 22, 2022
40 च्यावर आमदार तुम्हाला सोडून गेलेले आहेत. त्याविरोधात शिवसैनिकांमध्ये कुठेही उद्रेक नाही. याच्या पेक्षा स्पष्ट काय सांगायला पाहिजे, असं ही देशपांडे यांनी म्हटलं आहे.
जे नेते असतात मोठे मोठे मला असं वाटतं त्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललं आहे हे ओळखता आलं पाहिजे. कार्यकर्त्यांना काही गोष्टी स्पष्ट सांगायच्या नसतात. झाकली मूठ सव्वा लाखांची असते आणि त्यांच्या मनातलं ओळखून निर्णय घ्यायचा असतो. काही गोष्टी आपण बोलतो इन बिटविन द लाईन्स. अशा रिड करायच्या असतात. त्या तुम्ही रिड करताय मुख्यमंत्री साहेब. पण कळतंय पण वळत नाही. अशी अवस्था झाल्यासारखी वाटतेय, असं मतही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर व्यक्त केलं आहे.
इम्तियाज जलील यांच्याकडून कौतुक
उद्धव ठाकरेंनी आज केलेल्या भाषणाचं MIM चे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel)यांनी कौतुक केलं आहे. इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.
Appreciate the truthfulness of @CMOMaharashtra. We may have political/ideological differences with @ShivSena but after hearing Mr Uddhav Thackeray today my respect for him has simply grown. Your politeness gave a tight slap to all the dissenters within your party. @AUThackeray — Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 22, 2022
इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्यतेचं कौतुक करा. शिवसेनेशी आमचे राजकीय/ वैचारिक मतभेद असू शकतात. पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुमच्या विनयशीलतेनं तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिली.
या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी सीएमओ महाराष्ट्र, शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना टॅगही केलं आहे.
आपल्या भाषणात काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोविडच्या काळात जे काही काम करायचं ते प्रामाणिकपणे मी काम केलं. त्या दरम्यानच्या काळात जे काही सर्व्हे होत होते त्यानुसार देशातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश झाला.
गेल्या काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का? बाळासाहेबांची शिवसेना आता कुणाची? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाहीत? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापी शिवसेनेपासून दूर जाऊ शकत नाही. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
2014 च्या निवडणुकीत आपण एकट्याच्या ताकदीवर लढलो होतो. त्यावेळी सुद्धा ६३ आमदार शिवसेनेने निवडून आणले. माझ्यासोबत आता मंत्रिमंडळात असलेले नेते, आमदार हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचेच आहेत. मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं. बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहे. ज्यांना आपण आपले मानतो, मरमर राबतो आणि आपली माणसं एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ही कुठली लोकशाही आहे. लघूशंकेला गेलेल्या आमदारांवरही पाळत ठेवता ही कसली लोकशाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.