खेड (रत्नागिरी) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड येथील गोळीबार मैदानावर ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेत संबोधित केले, ज्यात निवडणूक आयोग, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सडकून केली. (Uddhav Thackeray's attack on BJP-Eknath Shinde in ratnagiri)
अधिक वाचा : Mhada Lottery । होळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांसाठी खुशखबर!, म्हाडाच्या 4 हजार 752 घरांसाठी लॉटरी
उद्धव ठाकरे म्हणाले, मला निवडणूक आयुक्तांना सांगायचं आहे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या. कोणती 'शिवसेना' ती बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही केली. माझ्या वडिलांनी केलीये, असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
अधिक वाचा : Mumbai : वंदे भारत सारखी चालणार वंदे लोकल
ठाकरे म्हणाले, सरकार चांगले चालले होते पण पडले का? कारण आम्ही फसलो होतो. आमच्या आमदारांना भूल देण्याचे इंजेक्शन देण्यात आले. आम्ही सर्वांनी मिळून पंतप्रधानांना पत्र दिले आहे, केजरीवाल मला भेटायला आले. ते म्हणाले की, खूप काही घडत आहे, आता एकत्र यायला हवे. मी म्हटलं मी तयार आहे. सुप्रीम कोर्टाने जसा निवडणूक आयोगाबाबत निर्णय घेतला तसाच आता ईडी आणि सीबीआयलाही तुरुंगात टाकावे लागणार आहे.
ठाकरे पुढे म्हणाले, कोणी विरोधी पक्षात गेले तर ते पापी आहे असे म्हणतात. आज भाजप हा सर्वात पापी लोकांचा पक्ष झाला आहे. भाजपमध्ये पूर्वी साधू-संत दिसत होते, आता सगळेच पापी झाले आहेत. मी मोदी विरोधी नाही. मी पूर्वीही चुकीच्या लोकांविरुद्ध बोलायचो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अफझलखान स्वारी करुन आल्यावर शिवरायांच्या मावळ्यांना आमच्या सैन्यात सामील व्हा नाहीतर कुटुंब उद्ध्वस्त होईल, अशी धमकी दिली होती. आमचे काही लोक गेले तसे काही लोक घाबरले. 300-400 वर्षांपूर्वी जे घडले तो इतिहास आहे. आज पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. मी त्यांना मोगॅम्बो म्हणतो कारण चित्रपटाप्रमाणे या लोकांनाही शांतता नको आहे, अशी भाजप आणि गृहमंत्री अमित शहांवर हल्ला चढवला.