जालना : शेतात विजेचा धक्का लागून तब्बल ६ गायी आणि ४ वासरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या आंबा गावात सदर घटना घडली आहे. दरम्यान, या गायींना गावातील महिलांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. मृत झालेल्या गायींचे गावातील महिलांनी औक्षण करून त्यांना ७०० ते ८०० साड्या नेसवून भावपूर्ण श्रद्धांजली देत साश्रू नयनांनी निरोप दिला आहे.विजेच्या स्पर्शाने ऐन पोळ्याच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाल्याने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले असल्याचं देखील यावेळी पहायला मिळाले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या गायींचा अंत्यसंस्कार पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक महिलांनी या मृत गायींचे औक्षण करून त्यांना ७०० ते ८०० साड्या नेसवून निरोप दिला. यावेळी साड्यांचा मोठा खच साचलेला दिसत होता. (As many as 6 cows and 4 calves died due to lightning)
अधिक वाचा ; तुम्हालाही फॅटी लिव्हरची समस्या आहे का? काय खावे, काय टाळावे
एकीकडे मोठ्या उत्साहाने पोळा हा सण साजरा करत असताना दुसरीकडे गावात घडलेल्या या घटनेमुळे पोळा सण साजरा न करता गावकऱ्यांनी दुखवटा पाळला होता. तर, भर पोळ्याच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे त्या मृत गायींवर काल २७ ऑगस्ट रोजी साश्रूनयनांनी पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठले यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आल्याचे पहायला मिळत होते. गायींचा अंत्यसंस्कार करताना महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पोळ्याच्या दिवशी आंबा गावावर दुःखाचे सावट पसरले होते. या मृत गायींवर अंत्यसंस्कार करताना आंबा गावाच्या महिला भगिनींनी अक्षरशः हंबरडा फोडला असल्याचे देखील पहायला मिळाले होते.
अधिक वाचा : अन् कुस्तीच्या आखाड्यात दोन गटात कुस्तीऐवजी तुंबळ हाणामारी
दरम्यान, ऐन पोळा सणाच्या दिवशी मन हेलावून टाकणाऱ्या घटनेला जबाबदार असलेल्या आणि अनधिकृतपणे तार लावून त्यात वीजप्रवाह सोडणाऱ्यावर रात्री गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक देखील केली आहे. निष्काळजीपणामुळे गायींचा मृत्यू झाल्यामुळे त्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक वाचा : दिवसभर भूक लागते?, मग Craving कमी करण्यासाठी खा या 5 गोष्टी