औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेमुळे अडचणीत आले आहेत. या सभेसाठी पोलिसांनी राज ठाकरेंना काही अटी घालून दिल्या होत्या. या अटींचं पालन न केल्यास पोलीस राज ठाकरेंवर कारवाई करणार असा इशाराही देण्यात आला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईस सुरूवात केली आहे. (case file against MNS president Raj Thackeray in Aurangabad)
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. १ मे रोजी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या १६ पैकी १२ अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल होताच मनसे पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक बोलवली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचा गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दक्ष झाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) आणि राज्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्यातही एक बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, असे अवाहन पोलीस महासंचालकांनी केले. तसेच, कोणी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. यात बाळा नांदगावकर यांच्यासह, नितीन सरदेसाई यांच्यासह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही मनसे नेत्यांना तर आपल्या शहरातून काही काळ बाहेर जाण्यासही सांगण्यात आल्याचे समजते. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या आधारे 4 मे नंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिक सक्रीय झाले आहेत.
राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल होताच संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्यावर असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. प्रक्षोभक भाषण करणे, अग्रलेख लिहिणे हे गुन्हे आमच्यावर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही.
राज्यात बाहेरुन लोक आणून दंगली घडवण्याचा प्रयत्न होणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पण कायद्याचे राज्य आहे, सर्व जण परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत.
एखाद्या पक्षाने अल्टीमेटम दिला म्हणून त्यानुसार राज्य चालत नाही. या ठिकाणी कायद्याचे राज्य आहे. कुणाच्या धमक्यांवर शांती बिघडत नाही असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या अल्टीमेटमवर प्रतिक्रिया दिली आहे.
दररोज सकाळी ते पत्रकारांशी संवाद साधत असतात. त्यानुसार आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले,
कुणी सभेतून काही बोललं म्हणजे काही होत नाही, आज शुभ दिवस आहे, धमक्या देणा-यांत ती ताकद नाही. त्यांच्यामागे ज्या शक्ती आहेत त्यांच्या त्यांचा बंदोबस्त करायला हवा असे भाजपचे नाव न घेता राऊत यांनी टोला लगावला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्या संदर्भात 3 तारखेचा अल्टीमेटम दिला असता उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आज वाशिम जिल्हाभरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कलम 107,व 149 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.