उस्मानाबाद : पती आणि पत्नीने सोबतच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. सततच्या भांडणाला कंटाळून त्याचबरोबर खासगी कर्ज डोक्यावर असल्याने सदर पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव या गावात घडली आहे. सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकाश वसंत दीक्षित (वय ३० वर्षे) असं पतीचे नाव आहे. तर अश्विनी प्रकाश दीक्षित (वय २७ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या पती आणि पत्नीचे नावं आहेत.
अधिक वाचा ; महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश हे शेती करत होते. सततच्या नापिकीमुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे झाले होते. यातूनच त्यांनी काही खासगी सावकारांकडून देखील कर्ज घेतले होते. शेतात काही पिकत नसल्याने कर्ज फिटत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली जमीन खासगी कर्ज फेडण्यासाठी विकली होती. त्यावरून दोघा पती आणि पत्नीमध्ये सतत वाद व्हायचा. याच उद्रेकातून दोघांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
अधिक वाचा : मुंबईला पुन्हा एकदा धमकी, प्रसिद्ध हॉटेल बॉम्बनं उडवणार?
दीक्षित कुटुंबातील पती-पत्नीने रविवारी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरातील पत्र्याखालील लोखंडी अडूला एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवले असून, पती आणि पत्नीने केलेल्या आत्महेत्येमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
अधिक वाचा ; प्रेषित पैंगबरांवर वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजप आमदाराला अटक
प्रकाश यांच्या आई रतन दीक्षित यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश सतत निराश असायचा. कारण, खासगी कर्ज फेडण्यासाठी त्याने चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली म्हणून प्रकाश आणि अश्विनी यांच्यामध्ये रोजच भांडण व्हायचे, या वादातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असं त्यांचे म्हणणे आहे. दीक्षित कुटुंब ८ दिवसांपूर्वीच पुण्याहून नायगावला राहायला आले होते. अशी देखील माहिती मिळाली आहे. तर सदर आत्महत्येप्रकरणी शिराढोण पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत कोणी तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही. प्रकाश यांच्या पश्चात आई, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.