बीड : २४ नोव्हेंबर २०२० मध्ये एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली होती. सदर शेतकरी हा बीड तालुक्यातील पाली या गावातील होता. सदर शेतकऱ्याचे नाव अर्जुन कुंडलीक साळुंके अस होत. दरम्यान, शेतकऱ्याने आत्महत्या पाटबंधारे कार्यालय बीड येथे केली होती. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग बीड ,भूमी अभिलेख उपअधीक्षक,बीड उपजिल्हाधिकारी बीड या तीन अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल दाखल झाला होता. मात्र खेदाची बाब म्हणजे या प्रकरणात अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही उलट या तीन अधिकारी अर्जुन सोळंके यांच्या पत्नी ताराबाई यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप ताराबाई यांनी गंभीर आरोप केला आहे. सदर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी बिंदुसरा धरण सांडव्याच्या स्मशानभूमीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे.
सदर शेतकऱ्याने अनेक वर्षे सरकारी कार्यालयावर खेटे मारून देखील त्यांच काम झाल नाही म्हणून शेतकरी हताश झाले होते. मात्र या प्रकरणी संबंधित सरकारी अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने दप्तर दिरंगाईला कंटाळून हताश झालेल्या अर्जुन कुंडलिक साळुंके यांनी २४ नोव्हेंबर २०२० रोजी अंगावर पेट्रोल ओतून बीड येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात पेटवून घेत आत्मदहन केले होते. भूमीअभिलेख कार्यालयाकडून एकत्रिकरणात झालेल्या अनियमिततेमुळे अर्जुन कुंडलिक साळुंके यांचे संपादित क्षेत्र व उर्वरित क्षेत्र यांच्यात गुंतागुंत होऊन कमी झाल्याने त्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालू होता. मात्र, याचा काही फायदा झाला नाही आणि शेतकऱ्याने आत्मदहन केले होते. या घटनेप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
दरम्यान आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा परत घेण्यासाठी पीडित कुटुंबातील व्यक्तींवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आत्मदहन केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. घरातील कर्ता पुरुष अकाली व धक्कादायकरित्या गेल्याने पीडित परिवाराचे सामाजिक व आर्थिक नुकसान झाले असताना देखील अधिकारी दबाव टाकत असल्याचा प्रकार मात्र धक्कादायक आहे.