मुंबई : विधानसभेचे उमेदवार जाहीर करण्यात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात स्वतः पवारांनी बीड जिल्ह्यातील ५ उमेदवार जाहीर केले. नावाची घोषणा झाल्यानंतर उपस्थितीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
राष्ट्रवादीचे एक एक करून मोठे नेते पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी प्रचाराची सर्व धुरा आणि पक्षाला उभारी देण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. काल ते सोलापुरात होते तर ते आज बीडमध्ये आहे. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
बीडमधील मेळाव्यात बोलताना पवार यांनी परळी विधानसभा मतदार संघासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा केली. तर गेवराई विधानसभा मतदार संघासाठी विजयसिंह पंडित यांच्या नावाची घोषणा केली. केज विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून विमल मुंदडा यांच्या कार्याचा विस्तार करणाऱ्या नमिता मुंडदा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच बीडमधून संदीप क्षीरसागर आणि माजलगाव प्रकाश सोळंके असे पाच उमेदवार राष्ट्रवादीने जाहीर केले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत या पाच पैकी चार जागेवर भाजप आणि एका जागेवर राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता. यातील बीडमधील जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून आता शिवसेनेचे शिवबंधन आपल्या हातात बांधले आहे. गेवराईतून भाजपचे लक्ष्मण पवार, माजलगाव येथून भाजपचे आर. टी. देशमुख, केजमधून भाजपच्या संगिता ठोंबरे आणि परळीमधून भाजपच्या पंकजा मुंडे निवडून आल्या होत्या.