Aaditya Thackeray: मुंबई: शिवसेनेचे बंडखोर 40 आमदार (Shiv Sena 40 Rebel MLA's) हे गेल्या दोन दिवसांपासून फारच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. '50 खोके, एकदम ओके...' अशी विरोधक सातत्याने घोषणा देत आहे. जी 40 आमदारांच्या फारच जिव्हारी लागली आहे आणि त्यातूनच काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत त्यांची शिविगाळ आणि धक्काबुक्की देखील झाली. ज्यानंतर आज पुन्हा एका शिंदे गटातील (Shinde Group) आमदार हे पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचं (Aaditya Thackeray) कार्टूनचं पोस्टर आणत त्यांच्यावर टीका केली. याच मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी या 40 आमदारांवर घरात चांगले संस्कार झालेले नाही असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं. (40 mlas must not have had good manners aaditya thackerays venomous criticism of rebels)
पाहा नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे:
मला त्यांची कीव येते...
'ज्याची भीती वाटते त्याच्यावरच जास्त स्लेजिंग केलं जातं. खरोखर आज ज्यांना पायऱ्यांवर उभं केलं त्यांची मला कीव येते. त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. त्यांना अपेक्षा हीच होती की, मंत्रिपदं मिळतील. पण ती मिळाली नाहीत म्हणून इम्प्रेस करायला माझ्याविरोधात बोलायला लागतंय आणि गळ्यात काय-काय घालून उभं केलं जातंय.' अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी आंदोलक आमदारांवर टीकेची झोड उठवली.
अधिक वाचा: तर मी आमदारकीचा राजीनामा देतो...: आदित्य ठाकरे
'घरी जे संस्कार झाले आहेत तेच ते दाखवत आहेत'
'दुसरी बाजू हीच आहे की, जी काही निदर्शनं झाली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे काही नैराश्य दिसतंय. जो शिवसेनेला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे भीती मनात आहे. गद्दारी या महाराष्ट्राला पटलेली नाही. हे देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली आहे.'
'आज ते शेतकऱ्यांचे प्रश्न, ओला दुष्काळ यासाठी उभे असते. किंबहुना महाराष्ट्रातील काही विषयासाठी उभे असते तर मला ते बरं वाटलं असतं. चला की, शिवसेनेची जी शिकवण आहे. ती त्यातून दिसली असती. पण त्यांच्या घरी जे संस्कार झाले आहेत तेच ते दाखवत आहेत.' अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
अधिक वाचा: 'शिंदे गटाच्या आमदारांनी आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या'
40 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं...
'मला वाटतं 40 लोकांनी राजीनामे द्यावेत. निवडणुकीला सामोरं यावं. त्यांचं काय देणंघेणं आहे. आम्ही 40 लोकांवर बोलतोय. यांच्या पक्षाने या 40 लोकांना फोडलंय का? तसं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते जगजाहीरपणे सांगावं.'
'अरे मी तर म्हणतोय... पहिले या 40 लोकांनी राजीनामा द्यावा. चला मी पण राजीनामा देईन... आणि निवडूण लढवीन. मी तर हेच म्हणेन की, हे सरकार घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे. संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करा आणि सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ. एकदा जनतेला ठरवू कोणाला सत्ता द्यायची ते.'
अधिक वाचा: मनपा निवडणुका एकत्र लढणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर
'आता सध्या जे काही चाललं आहे. ते आपल्या देशाला हानिकारक आहे. आपण बघत असाल की, जे काही गटातटाचं राजकारण झालं आहे. यामुळे देशातील प्रत्येक राज्यात अस्थिरता निर्माण होईल. जे देशाला परवडणारं नाही. जनतेला ही गद्दारी आवडलेली नाही. म्हणून मी सांगतोय 40 लोकांनी राजीनामा द्यावा आपण निवडणुकीला सामोरं जाऊ.' असं थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी 40 बंडखोर आमदारांना दिलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.