मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह एकूण ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं. त्यानंतर या बंडखोर आमदारांनी (Shiv Sena Rebel MLA) भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन केली. शिवसेनेतील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड ठरले असून आता पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ऊर्जा देण्याचं काम उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे करताना दिसून येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपली निष्ठा यात्रा सुरू केली आहे. निष्ठा यात्रे निमित्त आदित्य ठाकरे हे मुंबईतील दहिसर भागात आले असता त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, मी प्रत्येक शाखेत ज्या-ज्या ठिकाणी जात आहे, प्रत्येक मतदारसंघात जात आहे तिथे शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच उभा आहे. जे पळून गेले ते पळून गेले... प्रत्येक मतदारसंघात असे दोन ते तीन तगडे शिवसैनिक आहेत जे आजपण लढायला तयार आहेत आणि जिंकायला देखील तयार आहेत. मला इतकंच सांगायचं आहे, बंडखोरांमध्येही दोन गट आहेत आणि ते आज नाही तर उद्या कळतील. कारण, एक असा गट आहे ज्याला खरोखर जायचं होतं. दुसरा गट असा होता ज्यांना पळवून नेलं.
हे पण वाचा : गोव्यातही राजकीय भूकंप; काँग्रेसला मोठा धक्का, संध्याकाळपर्यंत 11 पैकी 9 ते 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
मला बंडखोरांना एकच निरोप द्यायचा आहे, जिथे गेला असाल तिथे आनंदी रहा. तुमच्या मनात आमच्याबाबत जसा राग, द्वेष आहे तसा आमच्या मनात नाहीये. मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की, तुमच्यात थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल... जिथे गेला असाल तिथे आनंदी रहा पण पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा आणि मग जनता जो कौल देईल, जो निकाल देईल तो मला मान्य असेल.
आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटलं, ज्यांना परत यायचं आहे त्यांनाही सांगतो की, परत यायचं आहे तर मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, आजही खुले आहेत आधीही होते आणि पुढेही असणार. आमचं मन मोठं आहे.
जसा आम्ही विश्वास त्यावेळी ठेवला होता तसाच आम्ही विश्वास प्रत्येक शिवसैनिकावर टाकत असतो. विश्वासाचा तुम्ही कसा गैरफायदा घेतला? उद्धव साहेबांच्या दोन सर्जरी झाल्या. अशा वेळी तुम्ही आमदारांची जुळवाजुळव करता... कशासाठी? पक्षासाठी नाही, शिवसैनिकांसाठी नाही तर स्वत:साठी करता. याचा राग नाहीये. राग आता कशावर काढायचा हे कळत नाहीये. ज्या मिनिटाला पक्षप्रमुखांना कोविड झाला त्या मिनिटाला तुम्ही पक्ष फोडायला सुरुवात करता याचं दु:ख मलाही आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.