मुंबई: साकीनाका (Sakinaka ) येथे ३० वर्षीय महिलेवर बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Sessions Court) फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या (State Government) वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मुंबईतील या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. बलात्कारानंतर महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. साकीनाका परिसरात झालेल्या संतापजनक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करत आरोपपत्र दाखल केलं होतं. या घटनेत एकच आरोपी आहे. पोलिसांनी ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद करुन ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केलं होतं.
या प्रकरणाचा जलद गतीने तपास करत केवळ एका वर्षाच्या याचा निकाल लावण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुंबईतील साकीनाका येथे बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणातील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल, असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं होतं.
आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हे कृत्य पूर्वनियोजित नव्हते असा निष्कर्ष काढत पोलिसांनी हा तपास तातडीनं पूर्ण केला. या आरोपपत्रात एकूण 37 जणांचे जबाब नोंदवले असून अॅट्रॉसिटी, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करुन तपास पूर्ण करण्यात आल्याचं पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. १० सप्टेंबर २०२१ च्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान त्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कंट्रोल रुमला फोन करून एका बाईला मारहाण सुरू असल्याचं कळवलं होतं. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं होतं. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. त्यावेळी पोलिसांनी महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी वॉचमनकडून घेऊन टेम्पो चालवत तिला राजावाडी रुग्णालयात नेलं होतं. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले होते. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.