Ajit Pawar denies jumping ship: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याबाबत गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू होत्या. या सर्व चर्चा सुरू असताना स्वत: अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणिवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना मी पाहत आहे. वास्तविक ज्या काही बातम्या चालल्या आहेत आणि ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत त्यात काहीही तथ्य नाहीये.
हे पण वाचा : गरोदरपणात मका खाल्यास काय होते?
तुम्ही माझ्याबद्दल सातत्याने ज्या काही बातम्या पसरवत आहात किंवा दाखवत आहात तर त्यात काहीही तथ्य नाहीये. तुम्ही जे दाखवलं की, 40 आमदारांच्या सह्या घेतल्या तर आमदारांच्या अशा सह्या घेण्याची काहीही गरज नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. त्यामुळे या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. काही वेगवेगळ्या चॅनल्सवर इतर राजकीय पक्षांचे नेते त्यांचे-त्यांचे मत व्यक्त करतात. त्यांनी काय मत व्यक्त करावं हे त्यांचा अधिकार आहे. मी नेहमीप्रमाणे माझ्या कार्यालयात बसतो. मंगळवार-बुधवार आमदारांच्या मिटींग असतात किंवा मंत्रालयात कामानिमित्त येत असतात. त्यामुळे आज काही आमदार मुंबईत आले होते ते मला भेटायला आले होते. ही नेहमीची पद्धत आहे. यातून वेगळा अर्थ काढू नका.
हे पण वाचा : फोटोमध्ये सर्वातआधी मुलगी दिसली की पक्षी? यावरुन जाणून घ्या तुमची पर्सनॅलिटी
यामध्ये धनंजय मुंडे असतील, देवेंद्र भोयार, शेखर निकम, अण्णा बनसोडे असतील, संजय मामा शिंदे असतील अनेक जण हे आपआपल्या कामानिमित्त आले होते. तसेच माझी सुद्धा काही कामे होते आणि त्यासाठी मी त्यांना फोन केला अन् त्या कामात मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वेगवेगळे आमदार येऊन भेटल्याचं दाखवत आहेत त्यातून त्यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो पक्षाचा कणा आहे तो सुद्धा संभ्रमावस्थेत जातो. त्या सर्वांना मला सांगायचं आहे की, काहीही काळजी करू नका. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक चढ-उतार आले. कधी सत्ता होती कधी नव्हती. पण ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्याच्या मागे आत्ता महाराष्ट्राच्या जनतेपुढे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या महत्त्वाचे प्रश्नांवरुन लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे. महत्त्वाचे प्रश्न काय आहेत तर तो बेरोजगारीचा आहे, महागाईचा आहे, अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान आहे, पंचनामे व्यवस्थित होत नसल्याचं आहे, नोकर भरती होत नाहीये. खरेदी केंद्र अनेक ठिकाणची बंद पडत आहेत असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही सर्वजण मविआच्या सभेसाठी नागपूर येथे गेलो होतो. तेथून परत येत असताना उद्धव ठाकरेंना मी विनंती केली की तुम्ही विमानाने आला आहात त्यात जागा आहे का? तर ते म्हणाले चला आमच्या सोबत. मी त्यांच्यासोबत आलो. तेथून आल्यावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय झाला होता. हा कार्यक्रम सुरू असताना अनेक श्री सदस्यांना उष्णाघाताचा त्रास झाला. काहीजण बेशुद्ध झाले काहींना आपले प्राण गमवावे लागले या वृत्तानंतर आम्ही थेट पनवेलच्या रुग्णालयात गेलो. त्यानंतर तेथे रुग्णांची विचारपूस केल्यावर उद्धव ठाकरे साहेब तेथून निघाले आणि मी विरोधी पक्ष नेता असल्याने इतर ठिकाणी भेटी दिल्या. इतकं मोठं संकट जेव्हा लोकांवर येतं तेव्हा त्यांना आधार देण्याची आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. जी काही संवेदनशीलता सरकारने दाखवायला पाहिजे तेथे सरकार कमी पडलं. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला. वास्तविक इतक्या उन्हात कार्यक्रम घेण्याचं काम नव्हतं.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा कार्यक्रम कुठेही असला तर तेथे श्री सदस्य मोठ्या संख्येने येतात. म्हणजे त्या कार्यक्रमाला आदल्या दिवशी सुद्दा काही नागरिक आले होते. त्यामुळे सकाळी 9 ते 11 दरम्यान कार्यक्रम घेतला असता तरी झालं असतं. आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये पण महाराष्ट्र भूषण पुरस्काराकरीता 13 ते 15 कोटी रुपये खर्च केला जातो. मग इतका खर्च केला जात असताना मंडप घालायला कुणी थांबवलं होतं. चांगल्या प्रकारे मंडप घातला असता तर काय बिघडलं असतं. तुम्ही माणसांच्या जीवाशी का खेळता? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रम संध्याकाळी घेता आला असता. सरकारचा निष्काळजीपणा नडला. या घटनेत सरकारचं अपयश होतं ही वस्तूस्थिती खरी आहे. पाच पाच लाख रुपये देऊन मृतकांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पैशात काही मोजता येत नाही. पण मृतकांच्या कुटुंबीयांना अधिकची मदत केली पाहिजे असं माझं स्पष्ट मागणं आहे. त्यांना यातून राजकारण साधायचं होतं का? म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी नाही त्यांच्या बद्दल निश्चितपणे आम्हाला आदर आहे. आपण ज्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देतो, कौतुक करतो त्या सर्वांचा आपल्याला अभिमान असतो. पण त्या विभागाचे सचिव असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना कळायला हवं की कार्यक्रम कधी घ्यावा, किती वाजता घ्यावा असंही अजित पवार म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.