Maharashtra Assembly Winter Session : मुंबई: विधीमंडळाच्या (Assembly) हिवाळी अधिवेशनात (Winter Session) उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांचा (MLA) क्लास घेतला. कशाप्रकारे वागलं पाहिजे, याचा सल्ला खुद्द अजित पवार यांनी आमदारांना दिला. मतदारसंघातील (Constituency) लाखो मतदार (Voters) तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी मिळते. तेव्हा आपण कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही, याची जाणीव आमदारांनी ठेवली पाहिजे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तुम्ही सभागृहात प्राण्यांचे आवाज काढता तेव्हा तो या मतदारांचा विश्वासघात आणि अपमान ठरतो. तुम्ही सभागृहात आवाज काढता किंवा टवाळी करता ते पाहून मतदारांना काय वाटत असेल याचा विचार आमदारांनी करावा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातील नवख्या आमदारांना कानपिचक्या दिल्या.
विधिमंडळातील सभागृहांच्या वर्तनाविषयी आचारसंहिता निश्चित करण्यासाठी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर सभागृहात आमदारांकडून शिष्टाचार सोडून होणाऱ्या वर्तनाला पायबंद घालण्याशिवाय चर्चा झाली. त्यावेळी अजित पवार यांनी नवख्या आमदारांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगितल्या. यावेळी अजित पवार यांनी आपल्या पहिल्या आमदरकीच्या टर्मविषयी सांगितलं. मी पहिल्यांदा आमदार होऊन सभागृहात आलो तेव्हा मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष होते. ते सभागृहात उभे असले की आम्ही दरवाज्यात थांबायचो. पण हल्ली सभागृहात तसे कोणतेही नियम पाळले जात नाहीत, असे अजित पवार यांनी सांगितले.
त्यादिवशी एक आमदार माझ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या आसनावर येऊन बसला. तेव्हा मी त्याला म्हटले की, किमान मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहू दे. तुला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळाला की इकडे बस. आमच्या काळात आम्ही सभागृहात असताना कॅबिनेट मंत्र्यांशीही त्यांच्या पाठीमागे राहून बोलायचो. पण आताचे आमदार दर दहा मिनिटांनी एक पत्र आणून देतात. क्रॉसिंगचा नियम तर कोणीच पाळत नाही. एखादा सदस्य बोलत असताना काहीजण गप्पा मारत असतात. आम्ही पूर्वी सभागृहात येताना अध्यक्षांना नमस्कार करायचो, जातानाही त्यांना नमस्कार करुन सभागृहाबाहेर पडायचो. मात्र, आता कोणीही आमदार झाले की त्यांना आपल्याला सगळंच समजतं असे वाटायला लागते. इतके वर्षे सभागृहात असूनही आम्हाला अजून सर्व समजले नाही तर यांना कुठून समजले असणार, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.