मुंबई: दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. दिल्लीतील जहांगीरपुरीमधील हिंसाचाराची घटना ताजी असताना मुंबईच्या आरे कॉलनीत हिंसाचाराची घटना घडली. आरे कॉलनीतील धार्मिक वाद काल रात्री शिगेला पोहोचला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद सध्या निवळला असून या परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईतील आरे कॉलनीत दोन गटात तुफान राडा झाला. शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शिव कलश यात्रेच्या मिरवणुकीत दोन गटातील वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरे कॉलनीतील गौतम नगर भागात काल रात्री दोन गटात तुंबळ राडा झाला होता. परिसरातील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान रात्री 8 वाजता दोन गटात वाद सुरू झाला त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. या हाणामारीत 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावघेत जमाव पांगवला.
दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही वाद उसळला होता. अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा शहरात आणि तर अचलपूर शहरातल्या दुल्ला गेट परिसरात झेंडा हटवण्याच्या वादातून दोन गट आमने सामने आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ठिकठिकाणी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणा आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.