Devendra Fadnavis PC: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्या (१७ ऑगस्ट २०२२) पासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. तसेच चहापानावर बहिष्कार टाकला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. विरोधकांना गजनीची लागण झालीय असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (Devendra Fadnavis slams opposition parties saying opponents are infected with ghajini watch video)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता आणि विरोधी पक्षांना निमंत्रित केलं होतं. नेहमीप्रमाणेच विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि सात पानी पत्र आम्हाला दिलं आहे. यातील मधले चार पाने बहुदा आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच आहेत. त्यातील अक्षरांतही फार फेरफार नाहीयेत. शब्दांमध्येही काही फेरबदल नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की, हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की, ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे मंत्रिमंडळ कार्यरत आहे त्या मंत्रिमंडळावर विरोधी पक्षाचाही विशेष विश्वास दिसतो. त्यामुळेच ते सत्तेत असताना जे-जे त्यांनी केलं नाही त्या सर्व अपेक्षा त्यांनी आमच्याकडनं व्यक्त केल्या आहेत. मी विरोधी पक्षांना आश्वस्त करु इच्छितो की, आमचं शिवसेना-भाजप युतीचं सरकार त्यांच्या सर्व अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल.
Media Interaction on eve of Monsoon Session of Maharashtra Legislature.@mieknathshinde https://t.co/j8CXXoVeh2 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 16, 2022
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मला आश्चर्य वाटलं की, आमच्या सरकारला ते म्हणाले की हे बेईमानाने आलेलं सरकार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी एकत्रित युती म्हणून मते मागितली होती. असे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊन हे सरकार तयार झालं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे बेईमानीचं सरकार होतं. जनतेच्या निर्णयावर सुरा खूपसून ते सरकार आलं होतं.
अधिक वाचा : शिवसेनेत गेलेले भाजपचे माजी आमदार परतले स्वगृही
३२ दिवस महाविकास आघाडीचाही मंत्रिमंडळ विस्तार नव्हता. त्या सरकारमध्ये ३० डिसेंबर २०१९ रोजी विस्तार झाल्यावर खातेवाटप हे ५ जानेवारी २०२० रोजी झालं. त्यामुळे जसं सुधीरभाऊ नेहमी सांगतात की, गजनीची लागण ही कुठेतरी विरोधी पक्षाला झालेली दिसतेय आणि त्याची आठवण आम्ही निश्चितपणे करू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अधिक वाचा : विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपची तयारी; मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता
आमच्या सरकारची चिंता करण्यापेक्षा त्यांनी विरोधकांच्या एकजुटीची चिंता केली पाहिजे. कारण, नुकतेच ते विरोधात गेल्यावर तीन पक्षांच्या तीन दिशा पहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेता आम्हाला न विचारता केला यावर काँग्रेसने आक्षेप सुद्धा घेतला आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.