Fadnavis flags off Ganpati-special 300 plus buses for Mumbaikars hailing from Konkan region : गणेशोत्सव हा महाराष्ट्रात साजरा होणारा सर्वात मोठा कौटुंबिक आणि सार्वजनिक सण आहे. दरवर्षी गणेशोत्सवात लाखो भाविक महामुंबईतून (Mumbai Metropolitan Area - MMR) कोकणात जातात. कामाच्या व्यापामुळे अनेक भाविकांना कोकणात जायचे असले तरी अॅडव्हान्स बुकिंग करणे कठीण जाते. या भाविकांसमोर आयत्यावेळी जास्त पैसे खर्चून मिळेल त्या पर्यायाने कोकणात जाण्याशिवाय गत्यंतर नसते. या भाविकांच्या सोयीसाठी मुंबई भाजपने ३००पेक्षा जास्त विशेष बसची व्यवस्था केली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बसना हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा पण उपस्थित होते. मुंबईतील वेगवेगळ्या भागांतून बस सोडण्यात आल्या. यामुळे शेकडो नागरिकांना कोकणात जाणे सोपे झाले. विशेष बस दहिसर, जोगेश्वरी, माहीम, वरळी, विक्रोळी, भांडुप येथून सोडण्यात आल्या. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मोदी एक्सप्रेस या विशेष ट्रेनची सोय केली. या ट्रेनमुळे एकदम काही शे नागरिकांना कोकणात जाणे सोपे झाले.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये गणपती असतो तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीनेही राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने दोन-चार आठवड्यात राज्यात अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. राज्यातील वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गांतील नागरिकांना उत्सवामुळे आर्थिक उलाढालीची संधी मिळते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या निमित्ताने अर्थचक्राला अल्पावधीत चालना मिळते.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत थोडी तफावत आहे. पण यातही कोकणातील गणेशोत्सव, पुण्यातील गणेशोत्सव आणि मुंबईतील गणेशोत्सव हे कायम चर्चेचा विषय राहिले आहेत. हे उत्सव बघण्यासाठी असंख्य नागरिक गणेशोत्सव काळात राज्यात येतात. उत्सव कसा साजरा होतो हे बघण्यासाठी तसेच उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने लाखो नागरिक प्रवास करतात. या काळात प्रवासाची उत्तम सोय असल्यास संबंधित भागातील सरकारी यंत्रणेविषयी नागरिकांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण होणे सोपे आहे. याच कारणामुळे भाजपने पुढील काही महिन्यांत होणार असलेल्या निवडणुकांचा विचार करून यंदा कोकणात जाणाऱ्या भाविकांकरिता सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढविले जात असले तरी सामान्यांकडून कोकणात जाण्यासाठी विशेष बस आणि विशेष ट्रेनची सोय केल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे कौतुक होत आहे. भाजपला विशेष बस आणि विशेष ट्रेनचा राजकीय लाभ होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.