Increased security for MNS chief Raj Thackeray : मुंबई : भोंग्यावरून अजान देण्याला विरोध करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भोंग्यावरून अजान झाली तर हनुमान चालीसा वाजवणार असे राज ठाकरे यांनी जाहीर केले. यानंतर राज ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आले. या पत्राची भाषा हिंदी-उर्दू अशी मिश्र स्वरुपाची आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच राज यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा वाय प्लस आहे. हा दर्जा कायम राहील. पण राज यांच्या सुरक्षेसाठी दोन अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती केली जाईल. यापैकी एक अधिकारी असेल आणि एक अंमलदार असेल. हा निर्णय महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने घेतला.
राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर या दोघांना धमकीचे पत्र आले. यानंतर बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. राज यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल अशा स्वरुपाचा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला. यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने राज ठाकरे यांच्या संरक्षणात वाढ करत असल्याचे जाहीर केले.
वाय प्लस संरक्षण व्यवस्थेत ११ पोलिसांचा ताफा असतो. यापैकी दोन किंवा चार पोलीस हे पोलीस दलातील प्रशिक्षित कमांडो असतात. राज ठाकरे यांच्या संरक्षणात वाढ केली असली तरी त्यांची संरक्षण श्रेणी वाय प्लस हीच आहे. यामुळे राज ठाकरे यांचे संरक्षण १३ पोलीस करतील.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.