Love Jihad : मुंबई : राज्यात हिंदू मुलींना फसवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन केले जात आहे असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये लव जिहाद कायदा करण्यात आला आहे त्याच धर्तीवर राज्यातही कायदा करणार का असा सवाल आज नितेश राणे यांनी विधीमंडळात उपस्थित केला. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (love jihad nitesh rane bjp mla ask law in maharashtra like uttar pradesh home minister devendra fadanvis answered in maharashtra assembly)
नितेश राणे विधीमंडळात म्हणाले की, धर्मपरिवर्तनासारखा प्रश्न महाराष्ट्रासाठी गंभीर आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात एक घटना घडली आहे. धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवले गेले आहे. राज्यात हिंदू मुलींना फसवून त्यांचे धर्मपरिवर्तन केले जात आहे. धर्मपरिवर्तनासाठी या लोकांनी रेट कार्ड ठरवल्याचे राणे यांनी सांगितले. त्यानुसार जर शीख मुलीला फसवले तर सात लाख रुपये, पंजाबी हिंदू तरुणीला आणि गुजराती ब्राह्मण मुलीला फसवले तर ६ लाख, ब्राह्मण तरुणीला फसवल्यास ५ लाख क्षत्रिय मुलीला फसवल्यास साडे चार लाख रुपये दिले जातात. जो तरुण मुलींना फसवतो त्यांना आधी पैसे, दुचाकी अशा अनेक प्रकारचे सहाय्य केले जाते. इतकेच नाही तर या मुलींना नंतर विकलेही जाते. धर्मपरिवर्तन करण्याच्या नावाखाली तरुणींचे भविष्य अंधारात ढकलले जाते. या प्रकरणी हलगर्जी दाखवल्याप्रकरणी संबंधित पोलिसांना निलंबीत करावे अशी मागणी राणे यांनी केली. तसेच या प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आणणार का असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.
यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नितेश राणे यांनी मांडलेला प्रश्न गंभीर आहे. अहमदनगरमध्ये आरोपी इम्रान युसुफ कुरेशी याने पीडितेवर तीन वर्षे अत्याचार केले. या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नाही. या प्रकरणी पोलीस अधिकारी सानप यांना निलंबीत करण्यात आले आहे. यात या पोलीस अधिकार्यांचे आणि आरोपींचे काही संबंध आहेत का हे तपासले जात आहे अशी माहिती फडणावीस यांनी दिली. तसेच असे असेल तर त्यांच्यावरही गुन्हेगारीचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल होईल. आरोपीवर मोठ्या प्रमाणात गुन्हे आहेत. जे काही विशेष कायदे आहेत त्याअंतर्गत कारवाई केली जाईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिली. तर धर्मातरसंबंधित कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे. कायद्यामधील तरतुदी आहेत. जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून कुणीही धर्मांतरण करू शकत नाही. या तरतुदींमध्ये काही कमतरता असेल तर तर त्याचा अभ्यास करून त्या तरतुदी अधिक कडक कशा करता येतील याचा प्रयत्न केला जाईल असेही फडणवीस यांनी नमूद केले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.