मुंबईः महाराष्ट्रात ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पण आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेत ५.२ टक्के डोस वाया गेले. जवळपास ४० हजार डोस वाया गेले. (maharashtra's vaccine wastage rate is 5.2 percent)
लसच्या बाटलीतून एकदा सिरिंजमध्ये लस ओढून घेतली की त्या बाटलीचा संपर्क आपोआप हवेशी येतो. संबंधित बाटली लगेच विशिष्ट तापमानात सुरक्षित ठेवली तरी पुढील सहा तासांमध्ये त्या बाटलीतील उर्वरित लस द्यावी लागते. जर उघडलेल्या बाटलीतील लस सहा तासांच्या आत संपवली नाही तर त्या बाटलीत उरलेली लस वाया जाते. याच कारणामुळे १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ५.२ टक्के लस वाया गेली आहे.
अनेकदा शेवटच्या सत्रात वापरलेल्या बाटलीतील लस वाया जाण्याचा धोका असतो. हे नुकसान कमी व्हावे यासाठी शेवटचे सत्र जवळ आले की ज्या बाटलीचा वापर सुरू आहे ती आसपासच्या काउंटरवर फिरवून झटपट संबंधित बाटलीतील सर्व डोस वापरण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक राज्यात या पद्धतीने नियोजन करुन लसीकरण केंद्रावर कमीत कमी लस वाया जावी यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र कितीही प्रयत्न केले तरी काही प्रमाणात लस वाया जाणे हे गृहित धरले असते. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात १० टक्के लस वाया जाईल असे गृहित धरून नियोजन करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार नियोजन करुन लसीकरण सुरू आहे. पण एवढे नियोजन करुनही महाराष्ट्रात आतापर्यंत ५.२ टक्के लस वाया गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार १३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ८ लाख ४७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सध्या देशात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. भविष्यात कोरोना होऊ नये म्हणून या लस घ्याव्या लागतात. लसचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. दोन्ही डोस घेतल्यानंतर एक ते दोन आठवड्यात शरीरात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता विकसित होऊ शकते.
आतापर्यंत भारतात १ कोटी ७ लाख १५ हजार २०४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यापैकी ७.५६ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात ८.२१ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसचा पहिला डोस आणि २६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लसचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
लसीकरण मोहिमेला १ महिना होऊ गेल्यानंतर लस घेण्यासाठी तयारी दाखवणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असताना दिसत आहे. सामान्यांसाठी मार्च महिन्यापासून लसीकरण सुरू होईल. पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाईल. मुंबईत १५ मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात होईल, असे संकेत मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.