मुंबई : राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्या. रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर 10 मिनिटांनी मोहित कंबोज फडणवीसांच्या बंगल्यावर गेले. दरम्यान रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांची फडणवीस यांच्याशी संयुक्त भेट झाली नाही. पण या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार का? रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चाही या निमित्ताने सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्या आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यांना महाराष्ट्रात पुन्हा बोलावलं जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये नियुक्तीवर आहेत.
Read Also : काबूल मशिदीत बॉम्बस्फोटात 20 जण ठार
दुसरीकडे मोहित कंबोजही फडणवीस यांच्या भेटीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे. त्यांनी सिंचन घोटाळ्यावरून आज ट्विटवर ट्विट केले होते. तसेच लवकरच एक बडा नेता आत जाणार असल्याचा दावा कंबोज यांनी केल्याने खळबळ उडाली होती.
Read Also : अपहरण झालेल्या काॅन्ट्रॅक्टरचा तीन दिवसानंतर नदीत मृतदेह
कंबोज यांच्या ट्विटमुळे विरोधक चांगलेच हादरून गेले होते. त्यावरून विरोधकांनी कंबोज यांच्यावर टीकाही केली होती. कंबोज यांनी स्पष्ट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या ट्विटचा सर्व रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याने या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कंबोज आज फडणवीस यांना भेटायला आल्याने या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.