Raj Thackeray: मुंबई : ३ मेपर्यंत मशीदींवरील भोंगे हटवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. राज्यातील काही मौलवी आणि धर्मगुरूंनी भोंगे हटवणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु मुंबईत याचा परिणाम दिसत आहे. अनेक मशीदींवरील भोंगे हटवले असून अनेक ठिकाणी भोंग्यांचा आवाज कमी झाला आहे. नाशिक पोलिसांनीही बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याचे आदेश दिले असून मशींदीसमोर हनुमान चालीसा लावण्यावर बंदी घातली आहे. राज्यात धार्मिक स्थळी लाऊडस्पीकर लावण्यावरून राज्य सरकारही लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे.
ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मुस्लि समाजाला त्यांनी आवाहन केले होते राज्य सरकारला याबद्दल अल्टिमेटम दिले होते. मुंबईत याचा परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील ७० टक्के मशीदींनी आपले भोंगे उतरवले आहेत. तसेच अनेक मशीदींनी आपल्या भोंग्यांचा आवाज कमी केला आहे.
राज ठाकरे यांनी आव्हान दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. जर कुठलीही व्यक्ती किंवा संघटना द्वेषाचे राजकारण करून राज्याचे वातावरण बिघडवत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरवरील मार्गदर्शक सूचना लवकरच जाही करण्यात येईल असे वळसे पाटील म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय काढल्यानंतर उत्तर प्रदेशातही यावर राजकारण सुरू झाले आहे. परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबद्दल निर्णय जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळी लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात आवाजाची मर्यादाही देण्यात आली आहे. धार्मिक स्थळाच्या बाहेर लाऊडस्पीकरचा आवाज जाता कामा नये असे राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच कुठलाही धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा किंवा मिरवणूक काढण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी गरजेची आहे असेही या आदेशात म्हटले आहे. अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी योगी सरकारच्या या आदेशाचे स्वागत केले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.