Reliance Industries chairman Mukesh Ambani get threat calls: सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबीयांना आज सकाळच्या सुमारास जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. धमकीचे तीनहून अधिक कॉल त्याच्या कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये आले होते. मुंबई पोलिसांनी सांगितले की, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने (Reliance Foundation Hospital) अंबानी कुटुंबाला देण्यात आलेल्या धमक्यांची तक्रार तात्काळ पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि धमकी देणाऱ्याला अटकही केली.
दरम्यान, पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने गिरगाव परिसरातील रुग्णालयात सकाळी 10.30 वाजता फोन केला आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने लँडलाइन क्रमांकावर तीन ते चार वेळा कॉल केला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासातून असे दिसते की आरोपी हा मानसिकरित्या अस्वस्थ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. ज्यानंतर दहिसर पोलिसांनी आरोपीला डीबी मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. विष्णू भौमिक (वय ५६ वर्ष) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे धमकीचे फोन फाउंडेशनच्या हरकिशनदास हॉस्पिटलमध्ये सोमवारी (15 ऑगस्ट 2022) आले. विशेष म्हणजे मुकेश आणि त्यांची पत्नी नीता अंबानी या स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच हे धमकीचे फोन आले होते. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांचा नातू पृथ्वी हा देखील होता.
सुरक्षा वाढविण्यात आली
या तक्रारीनंतर अंबानींच्या कुटुंबीयांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीत मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तीनहून अधिक धमकीचे फोन आल्याचा उल्लेख होता. यावेळी कॉलरने 8 कॉल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. या प्रकरणाची माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती.
मुकेश अंबानींना धमकीचं पत्र अन् महाराष्ट्रातील खळबळजनक राजकीय नाट्य
मागील वर्षी मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. ज्यामध्ये 20 स्फोटक जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. एवढेच नाही तर घराजवळून धमकीचे पत्रही जप्त करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण एखाद्या सिनेमातील स्टोरीलाही लाजवेल अशा पद्धतीने वळण घेत होता. ज्यामध्ये ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याची गूढ पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या सगळ्या प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील मोठे पडसाद उमटले होते. आणि ज्यामुळे पोलीस अधिकारी सचिन वाझे याला तुरुंगात जावं लागलं होतं. तसंच याच प्रकरणाशी संबंधित इतर गंभीर आरोपांमुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.