"आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत, तुम्हालाही घरी बसू देणार नाही" फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 20, 2022 | 13:52 IST

Devendra Fadnavis speech: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

Now CM will not sit at home and he will not let you sit at home devendra fadnavis taunts Uddhav Thackeray
"आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत, तुम्हालाही घरी बसू देणार नाही" फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला 
थोडं पण कामाचं
  • आपलं सरकार आल्यावर काल जल्लोषात दहीहंडी झाली - देवेंद्र फडणवीस
  • आता गणेशोत्सव, शिवजयंती सर्व जोरात करायचं - देवेंद्र फडणवीस 
  • आशिष शेलार पक्षाचे शिलेदार, मुंबईची मोहीम फत्ते करण्यासाठी शेलार यांची निवड - देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadnavis taunts to Uddhav Thackeray: मुंबई भाजप अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती झाल्यावर त्यांचा सत्कार सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत, तुम्हालाही घरी बसू देणार नाही असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आशिष शेलार यांच्या नेत्रृत्वात मुंबईत परिवर्तन घडणारच... आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली. तोच उत्साह, तोच जल्लोष, तिच संस्कृती, तिच परंपरा.. पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यावर काय घडतं हे आपण सर्वांना बघितलं. काल दहीहंडी जोरात.... आता गणेशोत्सव जोरात... नवरात्रौत्सव जोरात... शिवजयंती जोरात... आंबेडकर जयंती जोरात.. सर्व उत्सव जोरात आता करायचे आहेत. आता मुख्यमंत्री ही घरी बसणार नाही आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाही.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आशिष शेलार हे अतिशय अनुभवी आहेत. मुंबईत प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे. यावेळी शेलारांना अध्यक्ष बनवण्याचा निर्णय पक्षाने घेतला, याचं कारण काय... तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. छत्रपतींच्या इतिहासात जेव्हा एखादी मोहीम असायची आणि स्वराज्यासाठी ती मोहीम अत्यंत महत्त्वाची असायची त्यावेळी महाराज आपल्या उत्तम शिलेदार निवडायचे आणि त्याला सांगायचे.. जा आणि मोहीम फत्ते करुन ये... तसेच केंद्रीय भाजपने आपल्या आशिष शेलार यांना सांगितलं आहे की, मुंबई महानगरपालिकेवर भगवा लावायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही मुंबईचे अध्यक्षपद स्वीकारा.

अधिक वाचा : 'मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के'

मला विश्वास आहे, मागच्याही काळात ते अध्यक्ष असताना मोठी मजल मुंबई मनपात आपण मारली. त्यावेळी सुद्धा महापौर आपण बनवू शकलो असतो. आशिषजी आपली पूर्ण तयारी झाली असती. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण निर्णय घेतला, दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. पण आता मुंबई मनपावर शिवसेना भाजप युतीचाच महापौर बनेल. भगवा फडकेल. पण कुठली शिवसेना? हिदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिंदेजींच्या नेत्रृत्वात चालणारी शिवसेना... ती खरी शिवसेना आणि भाजप मिळून या मनपा निवडणुकीत आपला भगवा मुंबई मनपावर लावल्याशिवाय राहणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी