Diwali Pollution : ठाणे : जूनमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्व सण आणि उत्सवांवर निर्बंध हटवण्यात आले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात दणक्यात दिवाळी साजरी झाली. या वेळी ठाण्यात मोठ्या प्रामाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण झाले. २०१९ नंतर ठाण्यात सर्वाधिक वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारी दिवाळी साजरी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार वायू प्रदूषणात ४ तर ध्वनी प्रदूषणात तब्बल २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (pollution increased in thane city in diwali after firecrackers busted in festival)
अधिक वाचा : Osmanabad : उस्मानाबादमध्ये शेतकरी आंदोलन पेटले, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून टायर जाळले
हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आणि रात्रीही ठाण्यात ८० ते ११० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. ठाण्यात फक्त मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकरही लावण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक सण आणि उत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळे गेल्या २ वर्षांत ध्वनी आणि वायू प्रदूषणरहित दिवाळी साजरी करण्यात आली होती. यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर तसेच राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व सण आणि उत्सवांवर निर्बंध हटवण्यात आले होते. त्यामुळे ठाणे शहरात यावेळी दणक्यात दिवाळी साजरी करण्यात आली होती.
हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०० च्या आत असणे अपेक्षित आहे. परंतु दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हा निर्देशांक १९७ इतका होता. दिवाळीच्या आदल्या दिवशी हा निर्देशांक १३५ इतका होता. ठाण्यातील पर्यावरणाचे कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात ज्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण झाले आहे त्याचा पुढील एक महिना नागरिकांना त्रास होणार आहे. तसेच सध्या थंडीचा मोसम असल्याने त्यात आणखी भर पडणार आहे. दिवाळी झालेल्या प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडायाला ठाणेकरांना वेळ लागेल. आगामी काळात अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि सर्दीचा त्रास होईल असा अंदाज वालावलकर यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार
वालावलकर यांनी फटाके फोडण्यामागे सामाजिक कारण असल्याचे म्हटले आहे. ठाण्यातील झोपडपट्टी किंवा मध्यमवर्गीय रहिवासी भागात फटाके फोडण्याचे प्रमाण कमी होते. तर उच्च मध्यमवर्गीय आणि व्यापार करणार्या लोकांच्या सोसायटीत फटाके फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक होते. तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाके फोडण्याचे प्रमाण लक्षणीय होते असे वालावलकर म्हणाले. या लोकांमध्ये फटाके आणि प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्याची गरज वालावलकर यांनी व्यक्त केली आहे.
यंदा जरी प्रदूषण जास्त असले तरी नागरिकांनी यावेळी ग्रीन फटाके फोडले असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी मनीष प्रधान यांनी दिली. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात थोडी घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रात्रीच्या सुमारास थंडी वाढल्याने वायू प्रदूषण वाढल्याचा दावा प्रधान यांनी केला आहे.
ठाण्यातील प्रदूषण विरोधात काम कणारे महेश बेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ आणि १९ साली जेव्हा कोरोनाचे संकट नव्हते तेव्हा शहरात एवढ्या प्रमाणात दिवाळीत वायू आणि ध्वनी प्रदूषण झाले नव्हते. नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रदूषणरहित दिवाळी साजरी केली होती. कोरोना काळात निर्बंध असल्यामुळे दिवाळीत फार वायू आणि ध्वनी प्रदूषण झाले नव्हते. यंदा दिवाळी कुठल्याच प्रकारे जनजागृती झाली नव्हती तसेच नागरिकांनी कुठलेही निर्बंध स्वतःला घातले नव्हते. अगदी मध्यरात्रीपर्यंत लोक फटाके फोडत होते. सरकारनेही फटाक्यांवर कुठलेच निर्बंध घातले नव्हते. ठाण्यात अशाच प्रकारे दिवाळी साजरी होत राहिली तर ठाण्याची अवस्था राजधानी दिल्ली सारखी होईल अशी भिती बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.