मुंबई: केवळ ठाकरे आडनाव लावून चालत नाही अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. अमृता यांनी केलेल्या या टीकेला शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. “सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली”, अशा शब्दांत अमृता यांना या नगरसेवकाने प्रत्युत्तर दिले आहे.
रघुनाथदादा पेशवे हे इतिहासात बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरूवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचा मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक झाले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो”, असे प्रत्युत्तर अमेय घोले यांनी ट्विटरद्वारे अमृता फडणवीस यांना दिले आहे. हे ट्विट करताना त्यांनी ‘ठाकरे ठाकरेच’ आणि ‘आजच्या आनंदीबाई’ असे हॅशटॅगही वापरले आहेत.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही असे वक्तव्य केले होते. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात”, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती. फडणवीसांनी केलेल्या याच ट्विटचा मुद्दा घेत पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींबाबत केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी... त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वत:चे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत केले. या ट्विटमध्ये अमृता यांनी चक्क उद्धव ठाकरेंना टॅगही केले आहे. तेव्हा आता कॉंग्रेसवरून घसरत घसरत देवेंद्रजी आणि अमृताजी हे उद्धव ठाकरेंवर आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.