Ajit Pawar : मुंबईत सर्व समुदायासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह उभारणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

वांद्रे येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार असून, या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार
  • या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Ajit Pawar: नाशिक : वांद्रे येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार असून, या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नरेंद्र दराडे, मोहम्मद इस्माईल अ. खा., माजी आमदार अनिल कदम, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी. डी. देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुरुवातीच्या काळात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी वसतिगृहे निर्माण केली व शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात आणून त्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करणे, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी पाठविण्यासाठी मदत करणे हा विचार त्याकाळात शाहू महाराजांनी केला. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सुद्धा शिक्षण क्षेत्रात मोलाचे आहे. आजच्या काळात शिक्षणाचे चित्र बदलले असून शिक्षणाची साधने  सुद्धा अधिक प्रगत झाली आहेत. आपल्या संविधानाने आपल्याला सर्वधर्म समभाव ही शिकवण दिली आहे. देशात वेगवेगळ्या जाती, धर्म व पंथ जरी असले तरी सर्वांना एकमेकांचा आदर करण्याची शिकवण आपणास शिवाजी महाराजांनी दिली व त्याच मार्गाने फुले, शाहू व आंबेडकर यांनी  सर्वांना पुढे नेले व आजही सर्वांना त्याशिवाय तरणोपाय नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे. उच्च शिक्षणाची कास धरून आपले भवितव्य, पालकांचे व देशांचे नाव उज्ज्वल करावे. आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेवून एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी, असेही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी