मुंबई : राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या तर काही नव्या नावांना संधी मिळणार आहे. भाजप आणि शिंदे गटात मंत्री संख्या आणि खात्यांवर एकमत झाले असून मंत्रिमंडळात 35 जणांना संधी मिळणार आहे. उद्या, शुक्रवारी भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान शिंदे गटाला सरकारमध्ये 40% हिस्सा मिळेल. मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातील 21 मंत्री मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, तर शिंदे गटाला 12 मंत्रीपदे मिळू शकतात. 2 मंत्री इतर छोट्या मित्रपक्षांना दिले जातील. भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागणार आहे.
दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात आमदार निलंबन आणि शिवसेना पक्ष कोणाचा यावर सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय निकाल येईपर्यंत घेऊ नका, असं म्हटलं आहे. ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे द्यायची की नाही याबाबत सोमवारी निर्णय घेऊ. याप्रकरणी पुढील सुनावणी ही सोमवारी पार पडणार असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. एकीकडे सरकार राहणार की जाणार यावर सुनावणी चालू असताना शिंदे आणि फडणवीस सरकार पुढच्या तयारीला लागले आहे. मंत्रिमंडळासोबतच विभाग विस्तारावर देखील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपकडे गृह, वित्त आणि महसूल अशी मोठी खाती तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडे नगरविकास आणि रस्तेबांधकाम खाती दिली जाऊ शकतात. दीपक केसकर म्हणाले की, मंत्रिमंडळाबाबत सर्व काही निश्चित झाले आहे. या आठवड्यात केव्हाही नवीन मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. यावर सातत्याने सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आतापर्यत स्थगित करण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांची संख्या तसेच खात्याबाबत आतापर्यंत बोलले जात नव्हते. शिंदे गटालाही केंद्रात भागीदारी हवी आहे. त्यामुळे हे प्रकरण रखडले होते.
30 जून रोजी मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी 35 दिवसांत आतापर्यंत 6 वेळा दिल्लीला भेट दिली आहे. यादरम्यान त्यांनी निवडणूक आयोग आणि लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन शिवसेनेवर दावा ठोकला. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारासह अनेक मुद्द्यांवर भाजपने हायकमांडची भेट घेतली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.