मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला. शेतकरी आंदोलन, हिंदुत्व, मोटेरा स्टेडियमचे नामांतर यासोबतच इतरही मुद्दयांवरुन मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत भाजपला टोले लगावले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना ठाकरे सरकारवर पलटवार केल्याचं पहायला मिळालं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राम मंदिराच्या संदर्भात यांच्यातलं कोणी नव्हतं आम्ही होतो. बाबरी ढाचा पाडण्यासाठी हे कोणीच नव्हते आम्ही होतो, हे घरी बसले होते. जर जनता पैसा देत आहे तर एवढं का वाईट वाटतयं. असं आहे की ज्यांना खंडणी वसूल करण्याची सवय असते त्यांना जनतेचं समर्पण काय आहे हे समजत नाही आणि मनात जनतेच्या समर्पणाची सुई टोचते हे आज स्पष्ट झालं."
राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. कदाचित तासभर मुख्यमंत्री बोलले पण या तासभरात मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत. ते चीनमध्ये गेले, ते पाकिस्तानात गेले, ते अमेरिकेत गेले, पंजाबमध्ये गेले, बिहारमध्ये गेले, काश्मीरमध्ये गेले पण महाराष्ट्राबाबत या संपूर्ण तासभरात एक वाक्य ते बोलू शकले नाहीते.
मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले, पूर्वी ते नवीन होते आता नाहीयेत. पण चौकातलं भाषण आणि सभागृहातील भाषण हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नाहीये. सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर बोलावं लागतं, राज्याच्या प्रश्नांवर बोलावं लागतं. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मुद्दा देखील ते मांडू शकले नाहीत.
चीन समोर आले की पळे असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी भारताच्या सैनिकांचा अपमान केला आहे. ज्या सैनिकांनी उणे तापमानात चीनशी लढा करुन एक इंच जमीनही भारताची चीनला मिळू दिली नाही. त्या शूर सैनिकांचा जणू काय ते पळकूटे आहेत 'चीन समोर आले की पळे' असा उल्लेख करुन सैनिकांचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
राम मंदिराच्या देणगीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात भाष्य केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "बाबरी पाडली तेव्हा इतर पळून गेले होते फक्त शिवसेनाप्रमुख एकटे उभे राहिले होते. विषय असा झालेला आहे बाबरी कोणी पाडली तर आम्हाला माहिती नाही. सहा वर्षे केंद्रात सत्ता असतानाही राम मंदिरासाठी कायदा करा तर तो नाही केला. राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि आता राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन पैसे मागत आहेत. पैसे दिले कोणी तर जनतेने पण आमचं नाव आलं पाहिजे." असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.