मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरलेले असताना राज ठाकरे यांनी आज (१७ ऑक्टोबर) मुंबईतील प्रभादेवीमध्ये तुफानी फटकेबाजी केली. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा मतदारांसमोर मांडला. 'आज मराठी माणूस मुंबईतूनच काय तर कल्याण-डोंबिवलीमधून देखील हद्दपार होत चालला आहे. मुंबईतील अनेक डेपो बिल्डरांच्या घशात घालणं सुरु आहे. अशावेळी मराठी माणसं मुंबईतून बाहेर पडतात मग मुंबई सोडून कल्याण-डोंबिवलीला जातात. तिथेही आता जागा उरलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्याही पुढे तुम्ही आता जात आहात. एके दिवशी सरकत-सरकत उझबेकिस्तानला जाल.' अशा शब्दात राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आपली मतं व्यक्त केली.
याचवेळी राज ठाकरेंनी मुंबईतील मेट्रोविषयी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'माझा विकासाला कधीही विरोध नसतो. विरोधाला विरोध मी कधीच करत नाही. पण तुम्हाला सांगतो, मुंबईतील मेट्रो हिच मराठी माणसाचा घात करणार आहे. कारण मेट्रोमुळे जागांचे भाव वाढणार जे आपल्या हाताबाहेर जातील. त्यामुळे नालाजास्तव तुम्हाला मुंबईतून बाहेर पडावं लागेल आणि परप्रांतीयांची संख्या इथे वाढेल. त्यामुळे आता मुंबईची भाषा देखील बदलत चालली आहे.' असं म्हणत राज ठाकरेंनी मुंबई मेट्रोला देखील आपला विरोध दर्शवला आहे.
दुसरीकडे याच भाषणात राज ठाकरेंनी सरकारला खुनी रामन राघव सरकार म्हणून संबोधलं आहे. आरेच्या मुद्द्यावरुन त्यांनी ही टीका केली. 'आपल्या हिंदू संस्कृतीत लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की, रात्रीच्या वेळी झाडा-फुलांना हात लावू नये. पण या सरकारने भर रात्री २००० हून अधिक झाडं छाटून टाकली. यावेळी मला असं जाणवलं की, हे सरकार म्हणजे खुनी रामन राघव आहे. तो कसा रात्री लोकांच्या डोक्यात दगड टाकून हत्या करायचा तसंच काहीसं या सरकारने आरेबाबत केलं आहे.' अशा शब्दात राज ठाकरेंनी आपला आरेच्या वृक्षतोडीविषयी निषेध व्यक्त केला.
दरम्यान राज ठाकरे यांच्या दोन सभा आज मुंबईत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिली सभा ही प्रभादेवी आणि दुसरी सभा ही लालबाग येथे आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.