Inspector Daya Nayak: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून (ATS) मुंबई पोलिसात बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी दया नायक आणि इतर सात निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले. नायक यांच्यासोबत निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ आणि दौलत साळवे यांचीही दहशतवाद विरोधी पथकातून मुंबई पोलिसात बदली करण्यात आली आहे. (Who is Daya Nayak who started a school in his native village?)
1995 च्या बॅचचे अधिकारी दया नायक हे महाराष्ट्रातील बहुचर्चित पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. दया नायक यांचं जन्म गाव कर्नाटकमधील येनहोले. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना सातवीपर्यंतच शिक्षण घेता आलं. त्यानंतर 1979 ला त्यांनी मुंबई गाठली. उदरनिर्वाहासाठी एका हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली. इथेच दया नायक यांचा जेवण, राहणं आणि शिक्षण असा प्रवास सुरु झाला. हॉटेलच्या मालकानेच दया नायक यांना पदवीपर्यंत शिकवलं. त्यानंतर 1995 मध्ये दया नायक यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली.
नायक यांची सुरुवातच प्रदीप शर्मा यांच्यासोबत झाली. ते शर्मांसोबत गु्न्हे अन्वेषण शाखेत आणि एन्काउंटर पथकात होते. या काळात मुंबईत अंडरवर्ल्ड कारवाया शिखरावर होत्या आणि याच दरम्यान त्यांना 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. नायक यांनी 1996 मध्ये पहिला एन्काउंटर केला. त्यानंतरच्या काळात त्यांनी जवळपास 80 एन्काउंटर केल्याचा दावा केला आहे.
अधिक वाचा: ED, CBI Raid in Beed: बीडमधील शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयचे छापे
अनेक वाद, आरोप आणि माध्यमांमध्ये सतत चर्चेत असलेले अधिकारी म्हणून दया नायक यांची कारकीर्द गाजली. यामुळे त्यांना यापूर्वी निलंबनाच्या कारवायांना अनेकदा सामोर जावं लागलं आहे.
दया नायक यांनी 2000 साली आपल्या जन्म गावी शाळा सुरू केली होती. या शाळेचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या शाळेसाठीमदत केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर दाऊद आणि छोटा राजनच्या मदतीने ही शाळा उघडण्यात आल्याचा आरोप दया नायक यांच्यावर करण्यात आला. यात त्यांची चौकशी करण्यात आली पण ते निर्दोष आढळून आले.
अधिक वाचा: कोकणवासियांसाठी खुशखबर !, बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा एक्सप्रेसचे काम डिसेंबरपर्यत होणार पूर्ण
2006 मध्ये, माजी पत्रकार केतन तिरोडकर यांच्या तक्रारीनंतर नायक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यानंतर नायक यांना सुमारे साडेसहा वर्ष निलंबित करण्यात आलं होतं. कारण त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप होता. 2009 मध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक एसएस विर्क यांनी नायक यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याचं सांगत त्यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आलं. सुप्रीम कोर्टानेही 2010 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत त्यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले. त्यानंतर जून 2012 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आलं.
दोन वर्ष मुंबई विविध विभागात काम केल्यानंतर 2014 मध्ये, नायक यांच्या विरोधात चौकशी प्रलंबित असल्याच कारण देत त्यांची नागपूरला बदली करण्यात आली. मात्र, ते तिथं ड्युटीवर रुजू झाले नाहीत. नायक यांनी याबाबत राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक या दोघांनाही अधिकृतरित्या पत्र पाठवून त्यांची भूमिका मांडली. स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या कारणामुळे आपण नागपूरला जाऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, 2015 मध्ये नागपूरला रुजू न झाल्यानं त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं, नायक यांना 2016 मध्ये राज्य सरकारने पुन्हा सेवेत रुजू केले.
अधिक वाचा: Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' भागात 29 मार्चपर्यंत पाणी कपात
पुढे काही दिवसांतच त्यांची बदली दहशतवाद विरोधी पथकात झाली. इथेही त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. 2021 मध्ये मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एटीएसने तपास केला होता. दया नायक यांच्यावर या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप झाला आणि त्यातून त्यांची बदली गोंदियाला करण्यात आली. मात्र, बदलीच्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले आणि बदली आदेशाला स्थगिती मिळवली, त्यानंतर ते एटीएसमध्ये कार्यरत होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.