Ajit Pawar press conference: महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर विविध बातम्या समोर येत आहेत. शिवसेनेला खिंडार पडल्यावर आता काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) मोठं खिंडार पडणार असल्याचं वृत्त समोर आलं. त्यातच राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप येणार असल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. यावर अजित पवार यांना विचारले असता त्यांनी स्पष्टच उत्तर दिलं आहे. (Will political earthquake seen in NCP soon read ajit pawar reaction on this question)
अजित पवार म्हणाले, आमच्यात कुठल्याही प्रकारचा भूकंप होणार नाहीये. जे भूकंप-भूकंप म्हणणाऱ्यांनी आता राज्य ताब्यात घेतलं आहे ना.. ते व्यवस्थितपणे चालवा ना? ज्या समस्या आहेत त्या सोडवा ना?.... आता बहुमत आहे आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊनही समाधान नाही झालंय का? अजून भूक किती मोठी आहे ते तरी कळू द्यात.
सरकारमध्ये येण्यापूरती भूक होती ती आता भागवली आहे. धोंडा, दगड ठेवून भूक भागवली आहे. छताडावर.. कुठे ठेवला कुणाला माहिती. बरं झालं मोठा दगड नाही ठेवला, नाहीतर जीवच गेला असता. म्हणजे... झेपेल असाच दगड ठेवला आहे असंही अजित पवार म्हणाले.
अधिक वाचा : Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी
आमची बैठक सुरू असतानाच बबन तात्यांचा फोन जयंत पाटील यांना आला. अनेकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कामानिमित्त भेटत असतात. मला सुद्धा उपमुख्यमंत्री असताना अनेक पक्षांचे नेते भेटायला येत होते. भाजपचे आमदारही भेटायला येत होते. कुणीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाल्यावर ते राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सुद्धा भेटायला जातो आणि भेटायला गेलो म्हणजे दुसरं झालं का? तर तसं नाहीये तो एक कामाचा भाग होता म्हणून ते भेटले होते असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही हे फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती. का ते दोघांनाच असं वाटतं की, आपणच सरकार चालवतोय ते बरं आहे इतर कुणाचा त्रास नाही म्हणून त्यांचं चाललंय का आणखी काय चाललं आहे. वास्तविक लोकशाहीत असं वागून चालत नाही. संकटाच्या काळात पालकमंत्र्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. स्वत: मंत्री काम हातात घेतात तेव्हा प्रशासन यंत्रणेला कामाला लावायला बरं पडतं. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, वीजेची खांब पडलेत.
त्यातच आता ज्या एकनाथ शिंदे यांनी आमच्या सोबत सरकारमध्ये काम केलं आहे. त्यांनी आता मागच्याच कामाला स्थगिती देण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. असा दणका देण्याची सुरुवात करण्याचं काहीच काम नाही. सरकार येत असतात सरकार जात असतात. आता हे सरकार आलं आहे ते दोघं काय ताम्रपट घेऊन आले आहेत का? हे सुद्धा कधीतरी जाणार आहेत यांनी त्याचा काही विचार करायचा आहे की नाही. अशा प्रकारे काम बंद करणं बरं नाही. विकासाचीच कामे आहेत, ही कुणाच्या वैयक्तिक दारातील कामं नव्हती असंही अजित पवार म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.