MSRTC Strike : Transport Minister Anil Parab give final warning to Protestors मुंबईः महामंडळ राज्य शासनात विलीन करावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहमंत्री अनिल परब यांनी निर्वाणीचा इशारा दिला. आंदोलन करत असलेले तसेच निलंबन होऊनही आंदोलन करत असलेले अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवार १३ डिसेंबर २०२१ पर्यंत कामावर रुजू व्हावे. जे सोमवारी रुजू होणार नाहीत त्यांचे निलंबन करू; असा इशारा महाराष्ट्राचे परिवहमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला. ज्यांचे आधीच निलंबन केले आहे त्यांच्यापैकी जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर रुजू होतील त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, पण जे गैरहजर राहतील त्यांचे निलंबन कायम केले जाईल; असेही परिवहमंत्री अनिल परब म्हणाले.
एसटी महामंडळाने दहा हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. काहींच्या बदल्या केल्या आहेत. एवढी मोठी कारवाई झाली तरी अनेक एसटी कर्मचारी त्यांच्या राज्य शासनात महामंडळ विलीन करा या मागणीवर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका बघून आक्रमक झालेल्या शासनाने कठोर पवित्रा घेण्याचे स्पष्ट संकेत दिले.
संपामुळे एसटीला सुमारे ५५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीतही कर्मचाऱ्यांना पगारवाढ देत आहोत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावे; असे परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले.
न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीला बारा आठवड्यांच्या मुदतीत विलीनीकरणाबाबत त्यांचा अहवाल द्यायचा आहे. या अहवालाआधारे पुढील निर्णय होतील. पण कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ जाहीर झालेली आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे; असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले.
आंदोलन करत असलेल्या आणि अद्याप कामावर गैरहजर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व सदावर्ते करत आहेत. सदावर्ते आणि त्यांच्या सोबत असलेले एसटीचे कर्मचारी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे या मागणीवर ठाम आहेत; अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.