Nitin Gadkari on Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर नागपुरात (Nagpur) त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात भाजपच्या अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमात भाषण करताना गडकरींनी जोरदार फटकेबाजी केली. त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.
नितीन गडकरी म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑटोरिक्षा ड्रायव्हरपासून कामाची सुरुवात केली. बावनकुळे यांची परिस्थिती गरिबीची होती. स्वत:च्या कामाने आणि कर्तृत्वाने त्यांनी कामठी मतदारसंघ मजबूत केला. नागपूर जिल्हा मजबूत झाला आणि त्यात सिंहाचा वाटा हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली. कार्यकर्ते दोन प्रकारचे असतात. झोकून देऊन काम करणारे आणि काही फार हुशार असतात मेहनत करत नाही पण फोटोत येतात. चंद्रशेखर बावनकुळे हे मेहनती आणि संपूर्णपणे स्वत:ला कामात झोकून देणारा जिद्दीचा कार्यकर्ता आहे. ज्यांच्यावर अन्याय होत होता त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम बावनकुळे यांनी केलं. रात्रंदिवस मेहनत, परिश्रम करत त्यांनी काम केलं, माणसं जोडली.
देवेंद्रजी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना ऊर्जा खातं दिलं होतं. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली बावनकुळे यांनी खूप मोठं काम केलं. त्यांच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. अनेक ऊर्जा प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. बावनकुळे यांच्यात इतकं कर्तृत्व आहे की, ते माणसाला बाई बनवतील आणि बाईला माणूस बनवतील. कोणती फाईल कशी करतील.... बऱ्याच गोष्टी मला माहिती आहे पण सर्व सीक्रेट सांगू शकत नाही असंही गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं, कुठलंही काम करायचं असेल त्याची ओनरशिप असायला हवी. नगरपालिका, महानगरपालिका, नगरसेवकपद, आमदारकी... जनतेच्या सेवेची ओनरशिप घेतली पाहिजे... की मी हे काम करेन... हे कठीण आहे पण असंभव नाहीये. ही जिद्द होती ती बावनकुळे यांच्याजवळ होती. त्यामुळे एक कार्यकर्ता... रिक्षा चालवणाऱ्यापासून ते एक मंत्री म्हणून आपली एक प्रतिमा त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. त्या प्रतिमेच्यासोबतच भाजपचा विस्तार केला आणि कार्यकर्त्यांची मनंही सांभाळली.
जो प्रदेशाध्यक्ष होतो तो पुढे काय-काय होतो.... म्हणजे मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देतोय असं नाहीये हा.... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच झाले पाहिजेत. पण देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले तर त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार होऊ शकतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.