Story of Father : ही गोष्ट आहे एका गुन्हेगाराची (Criminal) आणि त्याच्यात असलेल्या बापाची (Father). 12 वर्षांपूर्वी खुनाच्या आरोपात (Murder) जन्मठेपेची (Life term jail) शिक्षा झालेल्या आरोपीने पॅरोलवर (Parole) सुटल्यानंतर गायब होण्याचा (Absconding) निर्णय घेतला. आपल्या जुळ्या मुलींचं (Twin daughters) संगोपन आणि त्यांचं शिक्षण (education) हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्याने हा धाडसी निर्णय घेतला आणि अनेक पथ्ये पाळत अंमलात आणला. त्यानंतर पु्ुन्हा तो पोलिसांना शरण गेला आणि सुखाने गजाआड जायला तयार झाला. नागपूरमधील ही घटना अनेकांना विचार करायला लावणारी ठरली आहे.
संजय तेजणे याचं सध्याचं वय आहे 50 वर्षे. खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या संजयला 12 वर्षांपूर्वी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येण्याची मुभा मिळाली होती. त्यानंतर तो पुन्हा तुरुंगात गेलाच नाही. तो गायब झाला आणि अज्ञात ठिकाणी आसरा घेत त्याने कमाई सुरू केली. आपली सगळी कमाई तो मुलींना देत असे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करत असे. आपल्या मुलींच्या शिक्षणात कुठलाही अडथळा येऊ नये, याची काळजी तो घेत होता आणि त्यांच्या भवितव्यासाठी सातत्याने पोलिसांना चकवा देत होता.
अधिक वाचा -Arpita Mukharjee : कोण आहेत अर्पिता मुखर्जी? यांच्या घरी टाकलेल्या धाडीत ED ला मिळाले 20 कोटी
आपल्या मुलींना सनदी अधिकारी बनवण्याचं त्याचं स्वप्न आहे. बारा वर्षांपूर्वी पॅरोलवर सुटल्यावर गायब झालेल्या संजयने एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. कुणाच्याही नजरेस न पडता तो सतत प्रिटिंग प्रेसमध्येच राहत असे आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत असे. वेळोवेळी तो आपल्या मुलींना चोरून भेटत असे आणि त्यांना शिक्षणासाठी आणि इतर घरखर्चासाठी आवश्यक पैसे पोहोचवत असे. मुलींना भेटण्याशिवाय इतर कुठल्याही कारणासाठी तो कधीही बाहेर पडत नसे. त्याने एवढ्या वर्षात कधीही मोबाईल वापरला नाही. मोबाईलच्या माध्यमातून गुन्हेगाराला पकडलं जाऊ शकतं, हे त्याला माहित होतं. त्यामुळे कितीही मोह झाला तरी तो कधीच मोबाईल वापरत नसे. इतरांच्या मोबाईलचा वापरही तो करत नसे. त्यामुळेच पोलीस त्याला पकडू शकले नाहीत.
नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. संजयच्या जुळ्या मुलींनी त्यात घवघवीत यश मिळवलं आहे. एका मुलीला 86 टक्के तर दुसऱ्या मुलीला 83 टक्के गुण मिळाले आहेत. आपल्या मुली आता मोठ्या झाल्या असून स्वतःची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत, असं संजयला वाटतं.
बारा वर्षे गायब राहून आपल्या मुलींचा सांभाळ केल्यानंतर संजयने स्वतःहून पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण गायब होण्याचा निर्णय घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यामागचं कारणही त्यानं स्पष्ट केलं आहे. मुलींचा निकाल लागण्यापूर्वीच त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. संजय आणि त्याच्या मुलींची सध्या नागपूर परिसरात जोरदार चर्चा आहे.