Manas Pagar Passes Away In Accident : नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले. मानस पगार सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. बुधवारी रात्री झालेल्या अपघातात त्यांनी प्राण गमावले.
आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल आहे. याच कारणामुळे मतमोजणीच्या ठिकाणी जायचे म्हणून मानस पगार बुधवारी रात्री त्यांच्या सहकाऱ्यांसोबत निघाले. प्रवासादरम्यान नाशिकच्या आडगाव परिसरातील उड्डाणपुलावर अपघात झाला. अपघातानंतर त्यांना नाशिकच्या लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून मानस यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. इतरांवर उपचार सुरू आहेत.
मानस पगार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनाची भरपूर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या भाषेविषयी आक्षेप घेत मानस पगार यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन सुरू असतानाच मानस पगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली. यानंतर मानस पगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम राबवली होती.
मानस पगार यांच्या निधनाचे वृत्त कळताच युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे", असे ट्वीट तांबे यांनी केले.
Bus Accident : पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा अपघात, 4 ठार
काँग्रेसने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी राबवलेल्या सुपर सिक्स्टी अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून २०२० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युवा जोडो अभियान (सुपर १०००) अभियान राबवण्यात आले. या अभियानासाठी मानस पगार यांच्याकडे मुख्य समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.