22 thousand 751 child deaths in Maharashtra during Mahavikas Aghadi Sarkar : महाराष्ट्रात जानेवारी २०२१ ते मे २०२२ या १७ महिन्यांत शून्य ते पाच या वयोगटातील २२ हजार ७५१ बालमृत्यू झाले. या कालावधीत राज्यात ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Sarkar) अस्तित्वात होते. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्याकडून समर्थन या संस्थेला माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली.
राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार २२ हजार ७५१ बालमृत्यूपैकी १९ हजार ६७३ हे अर्भकांचे (शून्य ते एक हा वयोगट) मृत्यू होते. तर ३ हजार ७८ हे एक ते पाच या वयोगटातील बालमृत्यू होते. पुण्याच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने दिलेल्या २२ हजार ७५१ बालमृत्यूच्या सविस्तर माहितीत मुंबईत १ हजार ३१७ बालमृत्यू झाल्याचे नमूद आहे. मुंबईत झालेले १ हजार ३१७ बालमृत्यू हे जानेवारी २०२१ ते मे २०२२ याच कालावधीतील आहेत.
समर्थन ही स्वयंसेवी संस्था महाराष्ट्रात बालकांमधील कुपोषणाची समस्या आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक पातळीवर कार्यरत आहे. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचा आढावा समर्थन ही स्वयंसेवी संस्था सातत्याने घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील अर्भक मृत्यू व बाल मृत्यूची आकडेवारी राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्याकडून संस्थेने मागवली होती.
महाराष्ट्रात जानेवारी २०२१ ते मे २०२२ या १७ महिन्यांत झालेल्या बालमृत्यूंपैकी ४६ टक्के बालमृत्यू फक्त नऊ जिल्ह्यांमध्ये झाले. महाराष्ट्रात शासकीय यंत्रणा आरोग्याचा दर्जा सुधारावा कुपोषण आणि बालमृत्यू कमी व्हावेत यासाठी बारा योजना राबवते. या योजनांचा सकारात्मक परिणाम जानेवारी २०२१ ते मे २०२२ या १७ महिन्यांत दिसलेला नाही, असे समर्थन या स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासातून निदर्शनास आले.
बालमृत्यूचा विचार (अ) नवजात अर्भकावस्थेतील म्हणजे जन्मापासून १ वर्षांपर्यंत घडून येणारे मृत्यू व (ब) उत्तरकालीन बालमृत्यू असा करतात. अलीकडील संशोधनात बालमृत्युमानाचा संबंध अर्भकाचा जन्मक्रम, जन्माच्या वेळी असणारे वजन, जुळेपणा, मातांची वये ह्या जीवशास्त्रीय घटनांशी निगडित असल्याचे आढळून आले आहे. अपत्यजन्माच्या वेळी मातेचे वय अगदी कमी किंवा अधिक असले, दोन अपत्यांच्या जन्मांमधील अंतर कमी असेल किंवा मातेला बरीच अपत्ये झाली असली, तर अर्भकमृत्यूची संभाव्यता जास्त असते. सर्वसाधारणपणे अधिक जनन हे निकृष्ट आर्थिक-सामाजिक परिस्थितीतच आढळून येत असल्याने निकृष्ट जीवनमान असणाऱ्या समाजात बालमृत्युमान अधिक असते. घरातील गर्दी, अपुरा प्रकाश व हवा, पाण्याची कमतरता, आरोग्याच्या अपर्याप्त सोयी, अस्वच्छता तसेच घटसर्प, डांग्या खोकला वगैरे साथींच्या आजारांच्या वेळी योग्य ती काळजी न घेतली गेल्याने बालमृत्युमान अधिक असते. बालमृत्युमानावर नागरी व ग्रामीण राहणीचाही परिणाम वेगवेगळा झाल्याचे दिसते.