सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी अटकेत असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण होणार की इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये त्यांना वर्ग केलं जाणार हे आज समजणार आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर चार आरोपींचा शुक्रवारी जामीन फेटाळला होता. यामध्ये सचितानंद पुरी, राम कातकडे, संकेत नेहरकर आणि रमेश गोरे यांचा समावेश आहे. या हल्ल्याप्रकरणातील सर्व म्हणजे 115 आरोपी आज सोमवारी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी संदीप गोडबोले आणि अजित मगरे यांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या चार आरोपींपैकी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी या हल्ल्यामध्ये सदावर्तेंचा हात असल्याचं कबुल केलं आहे.
मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर आता बीडमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. स्वप्निल गलधर यांनी सदावर्ते विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.