Amol Mitkari big claim about MLC election: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेसाठी गेल्या महिन्यात निवडणूक पार पडली. या निवडणुकीत २८५ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत काही मते फुटल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) एक खळबळजनक दावा केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी भाषण करताना हा दावा केला आहे. त्यासोबतच सध्याचं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Eknath Shinde and Devendra Fadnavis Government) हे दीड महिन्यातच कोसळणार असल्याचा दावाही अमोल मिटकरी यांनी केला आहे. (Amol Mitkari said 3 mla received 21 crore for voting in Maharashtra MLC Election 2022)
अमोल मिटकरी म्हणाले, विधानपरिषदेच्या आता ज्या निवडणुका झाल्या त्यात एका पक्षाचे तीन मते फुटली. ही तीन मते २१ कोटींना फुटली. तीन मते २१ कोटींना फुटली. आपल्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे आणि चार एक जमीन विकली तरी २० लाखच मिळतील. इथं उमेदवाराला सात-सात कोटी मिळत आहेत. एका-एका उमेदवारासाठी जो घोडाबाजार झाला आहे ना.... हा आरोप आहे मी प्रत्यक्ष तर पाहिलं नाहीये.
हे पण वाचा : Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी
अमोल मिटकरी पुढे म्हणाले, आम्हाला सुद्धा ऑफर आहे. या गटाचे अध्यक्ष व्हा... एक मर्सिडीज घ्या, दोन लाख रुपये महिना घ्या आणि वर दोन खोके पण घ्या अशी ऑफर आहे.
हे सरकार दीड महिना सुद्धा टिकणार नाही. आपला शब्द खोटा नाही. दीड महिन्यानंतर राष्ट्रपती राजवट लागल्यावर मध्यावर्ती निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील क्रमांक एकचा पक्ष असेल असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा : Sanjay Raut : ज्यांनी पुरावे दाखवायला लावले त्यांना ही पापं फेडावी लागतील, शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका
एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटींना फुटल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. मात्र, आता हे तीन आमदार नेमक्या कुठल्या पक्षाचे आहेत यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारांना जिंकण्यासाठी २६०० मतमूल्यांचा कोटा पूर्ण करायचा होता. पहिल्या फेरीत भाजपच्या राम शिंदे यांना ३०००, भाजपच्या श्रीकांत भारतीय यांना ३०००, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांना २९००, भाजपचे प्रवीण दरेकर यांना २९००, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांना २७००, भाजपच्या उमा खापरे यांना २७००, शिवसेनेचे सचिन अहिर यांना २६००, शिवसेनेचे आमश्या पाडवी यांना २६०० तर पाचव्या फेरीअखेरीस भाजपच्या प्रसाद लाड यांना २८५७ इतके मतमूल्य मिळवत विजय मिळवला.
दहाव्या आणि शेवटच्या फेरीअखेरीस काँग्रेसचे भाई जगताप यांना २४७४ तर काँग्रेसच्याच चंद्रकांत हंडोरे यांना २२०० इतकी मतमूल्य मिळाली. या फेरीअखेर भाई जगतपा यांना विजयी घोषित केले अन् चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला.