पुणेः जगभरात हैदोस घातलेल्या कोरोनाने भारतात शिरकाव केला आहे. कोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यातच त्यावर आता पुण्यातल्या एका संस्थेनं या व्हायरसवर लस शोधल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं जात आहे.
पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेनं या व्हायरसवर लस शोधली असल्याचा दावा केला आहे. या प्राणघातक आजारावर लस आपण विकसित केली आहे अशी माहिती या संस्थेनं दिली आहे. ही लस व्हायरसच संक्रमण रोखण्यासाठी कमी वेळेत रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असल्याचा दावा या संस्थेनं केलाय.
सध्या प्राथमिक स्तरावर चाचण्या सुरू करण्यात आल्यात. ही लस रोग प्रतिकारक शक्ती वाढवून एक प्रकारचे सुरक्षा कवच तयार करत असल्याचा दावा या संस्थेनं केला आहे. येत्या पुढच्या आठवड्यात उंदीर आणि माकडावर त्याच्या चाचण्या केल्या जातील. मानवी चाचण्या करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. दुबईहून आलेल्या एका दांपत्याला पुण्यात प्रथम कोरोना व्हायरस असल्याचं उघड झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाले. पुण्यातील नऊपैकी सात कोरोनाबाधित हे दुबईला फिरायला गेले होते, तर आठवा रुग्ण त्यांना मुंबई एअरपोर्टवरून पुण्याला घेऊन येणारा ड्रायव्हर होता. तसंच पुण्यातील नववा रूग्ण हा यांच्या संपर्कातील नसून हा रूग्ण एक मार्च रोजी अमेरिकेहून भारतात परतला होता. तसेच ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्ण फ्रान्सवरून परतला आहे. अशातच मुंबईतील तिसरा कोरोनाबाधित रूग्ण वृद्ध असून तो दुबईवरून परतला आहे.