Pune Guidelines | पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचं देशात ओमायक्रॉनचे नवीन संकट आले आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात देखील मोठ्या प्रमणात वाढत असल्याने सरकार आणि जनतेची देखील डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान, आज मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये देखील ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या (Pune District) सूचनेनुसार पुण्यातही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारद्वारे सतर्कतेचा इशारा म्हणून शासन नवी नियमावली करत आहे. (New Pune Guidelines amid Omicron spread)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ (Christmas 2021) सणाच्या सेलिब्रेशनसाठी आधीपासून राज्य सरकारनं नियमावली घोषित केली होती. त्यानंतर आता पुण्यातही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ही नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या नियमावलीचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
१ ) सामाजिक राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी बंद जागेत १०० जणांना परवानगी, तर मोकळ्या जागेत जास्तीत जास्त २५० जणांना परवानगी
२ ) सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत एकत्र येण्यास परवानगी नाही.
३ ) क्रीडा स्पर्धा आणि विविध सामन्यांचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी
४ ) मोकळ्या जागेत विवाहसमारंभ करण्यासाठी जास्तीत जास्त २५० आणि त्या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीची मर्यादा
५ ) विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करण्यासाठी १०० जणांची मर्यादा
६ ) रेस्टॉरंट, फिल्म, सिनेमा आणि नाट्यगृहांसाठी ५० टक्के उपस्थितीची परवानगी
सध्या राज्यात कोरोनाचे १ हजार ४०० च्या आसपास रुग्ण आढळून येत असून भविष्यात तिसरी लाट ओमिक्रॉनचीच असेल, अशी भीती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. यूरोपमध्ये कोरोना संसर्ग अधिक वेगाने पसरत असला तरी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.
१२ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असून याबाबत निर्णय व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर, केंद्राने आता बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचं असून याबाबत आता निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी देखील राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात दररोज ६ ते ७ लाख लसीकरण होत असून लसीकरण वाढवण्यात येत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. राज्यात जवळपास १०० ओमायक्रोनचे रुग्ण आहे. राज्यात पहिला डोस ८७ टक्के लोकांनी घेतला असून दुसरा डोस ५७ टक्के लोंकांनी घेतला आहे. लोकांनी लसीकरणात सहभाग घेतला पाहिजे तरच लसीकरण पूर्ण होईल. असंही टोपे म्हणाले.