Raj Thackeray Press conference : पुणे : हनुमान जयंतीला महाआरती केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत राज ठाकरे लाऊडस्पीकर आणि राष्ट्रवादी-मनसे यांच्या सुरु असलेल्या वादावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. परंतु पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याची भूमिकेविषयी ठाम राहत कार्यकर्त्यांना 3 तारखेला तयार राहण्यास सांगितलं आहे. याशिवाय त्यांनी भोंग्यांना आपण जशास तसे उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भोंग्याच्या विषयावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितले की त्यांचे बाळ लहान असताना त्यांना भोंग्याचा त्रास झाला. त्यांनी स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितले. भोंग्याच्या आवाजाचा त्रास हा हिंदूनाच नाही तर मुस्लिमांनादेखील होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत PFI च्या धमकीलाही राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही आमचे हात बांधलेले नाहीत असं उत्तर त्यांनी दिलं आहे. जर तुम्ही मशिदीच्या कोणत्याही भोंग्यांला हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही समोर उभे असू. छेडछाड कराल तर सोडणार नाही. आम्हाला देशात शांतता हवी आहे, मात्र तुम्ही भोंग्यांना हात लावलात तर आम्हीही गप्प बसणार नाही, असे पीएफआय मुंब्राचे अध्यक्ष मतीन शेखानी यांनी आपल्या भाषणात म्हटलं होते. यावर आज पुण्यातील पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राज ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली, त्यावर उत्तर राज ठाकरे म्हणाले की, तसे असेल तर आमचेही हात बांधलेले नाहीत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.
या देशातील कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का असा सवाल राज यांनी उपस्थित केला. ज्यांना कायद्यापेक्षा भोंगा मोठा वाटतो त्यांना जसास तसे उत्तर देणार असल्याचेही राज यांनी सांगितले. त्यांनी जर पाचवेळा भोंगा लावून अजान म्हटली तर आम्ही देखील पाचवेळा मशिदींसमोर आरती म्हणार असल्याचे राज यांनी सांगितले. महाराष्ट्राची शांतता भंग करायची नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दंगल, हाणामारी करायची नाही. आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे असेही राज ठाकरे यांनी म्हटले.