सिंधुदुर्ग : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी, असं पत्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिलं आहे. पोलीस कमी पडले तर माझी असलेली सुरक्षा काढून केसरकर यांना द्यावी, अशी स्पष्ट भूमिका आमदार वैभव नाईक यांनी मांडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या दीपक केसरकर यांना आमदार नाईक यांनी एकप्रकारे जोरदार टोला लगावला आहे.
दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते आहेत. ते सध्या एकनाथ शिंदे गटात असून त्यांनी राज्यातील सरकारला अडचणीत आणलं आहे.दरवेळी पक्षांतर करताना केसरकर यांची सुरक्षितता धोक्यात आलेली असते. असं केसरकर यांचं म्हणणं असतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता शांत आहे. बंडाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर किंवा अन्य ठिकाणी शिवसैनिकांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. दरवेळी पक्षांतर करताना केसरकर यांना सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित का करावा लागतो? याचं आत्मचिंतन केसरकर यांनी करावं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना पाच वर्षे गृहराज्यमंत्री पद दिलं होतं. याचा भान केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर बोलताना ठेवाव. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाचीही सुरक्षा काढलेली नाही. व कुणाला सुरक्षा दिलेली नाही.
राणेंचा दहशतवाद कुणी मोडून काढला आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. झेंडे घ्यायला कार्यकर्ते नसताना राणे यांच्या विरोधात कोणी उमेदवारी भरली हे देखील जनतेला माहिती आहे. आमने-सामने कोणी केलं हे देखील जनतेला माहीत आहे. मात्र अनेकदा केसरकर सांगताहेत की राणेंचा दहशतवाद आपण मोडला. पण खरा दहशतवाद कोणी मोडला हे शिवसैनिक व जनतेला माहिती आहे. २००९ मध्ये माझा जीव धोक्यात घालून मी राणेंच्या विरोधात उमेदवारी भरली. त्यावेळी मला ५० हजार मते मिळाली. दोन वेळा माझा जीव वाचला होता. राणेंच्या गाड्या पाठलागावर होत्या. मात्र याचा आम्ही केव्हा बाऊ केला नाही. मी माझं हे मोठेपण यापूर्वीही सांगितलं नाही व यापुढेही सांगणार नाही. असेही श्री नाईक म्हणाले. केसरकर यांचा दहशतवादाचा मुद्दा निवडणूक आली की सहा महिने अगोदर येतो. गेल्या अडीच वर्षात केसरकर यांना हा दहशतवाद दिसला नाही. मात्र आता सरकार बदलते असे चित्र पाहून ते दहशतवादाच्या नावाने टाहो फोडू लागले असा टोला आ.वैभव नाईक यांनी लागवला.