मुंबई : सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. आता या विमानतळाच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. नारायण राणे यांनी या नावाच्या राजकारणात बाळासाहेबांचे नाव पुढे करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अडचण केली आहे. चिपी विमानतळाच्या नामकरणासाठी दोन दिग्गज नावांचा प्रस्ताव समोर आलाय. यात शिवसेना प्रमुख स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपाचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
सन्माननीय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा Dream Project आहे.. म्हणून या विमानतळाला "स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ" हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 20, 2020
नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ नारायण राणे Dream Project आहे. म्हणून या विमानतळाला "स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ" हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव चिपीच्या विमानतळाला दिले, तर त्यांनी नारायण राणेंची मागणी मान्य केली असे होईल. तसेच बॅरिस्टर नाथ पै याचे नाव दिले तर नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला मोकळे होतील, अशी दुहेरी खेळी नारायण राणे यांनी या निमित्ताने केली आहे.
तसेच नारायण राणे यांनी देखील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, असं मत व्यक्त केलं आहे. मात्र प्रथम विमानतळ सुरू करा, मग नाव द्या, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
केंद्राने राज्याला नाव देण्याचा अधिकार असल्याचं सांगितलंय. विमानतळ लवकर चालू करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. 26 जानेवारी 2021 ला हे विमानतळ सुरू करण्याबाबत संबंधितांना सांगितलं आहे. याबाबत परवाना (लायसन्स) मिळालं की लवकरच विमानतळ सुरू करू. हे विमानतळ अत्याधुनिक पद्धतीने बनवलं असल्याने त्याचा मोठा उपयोग होणार आहे, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.