चिपळूण : विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Shiv Sena MLA Bhaskar Jadhav) हे त्यांच्या चिपळूण (Chiplun) तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. आमदार भास्कर जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. त्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरतं.
समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाची घोटशीर तुटली होती आणि त्यानंतर काही दिवस ते चालू शकले नव्हते. परंतु, त्यावर त्यांनी मात केली. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना पहावयास मिळाले.