कल्याण : सध्या राज्यात जे राजकारण चाललं आहे हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं दिसत असले तरी यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे, त्यामुळे हे सगळ घडतंय,अस म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणमध्ये केले. कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, या सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
माझ्या मागे जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती तुमची आहे, मला सर्वोच्च स्थानापर्यंत पोचविण्याचे काम तुम्हीं केलं मी राज्याचा आमदार आहे कधी ही मला बोलवा मी येईन येत्या काही महिन्यात महिन्यातून एकदा एक दिवस कल्याणमध्ये तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी असेन, असं विश्वास त्यांनी कल्याणकरांना दिला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, प्रमाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जमिनीचे आरोप झाले, इतकं छळलय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही, मात्र राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होतं नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला. माझा जावयी माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी यांच्या मागे चौकशा लावण्यात आल्या. सगळं कुटुंब आठवड्याला ईडी कार्यालयात बसायचं.
मी काय गुन्हा केलाय, कुठे पैसे खाल्ले, काय घेतलं तुम्ही दाखवा ना? असा भावनिक सवाल केला. पुढे बोलताना खडसे म्हणाले, मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले एक रुपया ठेवला नाही. पहिले खाते सीझ केलं आता पैसे काढून टाकले, त्यानंतर राहते घर दहा दिवसात खाली करण्याची नोटीस आली, असा नाथाभाऊने काय गुन्हा केला. न्यायालयातून जावून त्या नोटीसवर स्थगिती आणली म्हणून त्या घरात राहतोय, असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हतं. असेच राजकारण करायचे असते तर अनेकांना मला छळता आले असते. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकते. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही दुसऱ्यांना सहकार्याची भूमिका असते, न्यायालयाने संरक्षण दिलं म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत. नाहीतर संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली, त्यांनी मदत केली नाही तर नाथाभाऊ होत्याच नव्हता झाला असता, असं खडसे म्हणालेत.