MHADA Township in Ambernath । ठाणे : अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातली सर्वात मोठी टाऊनशिप उभारण्यात येणारेय. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या २०० एकर जागेचा आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीये.
मुंबई उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्यानं वाढत चाललीये. मात्र हा वाढता भर मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळं या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. ही टाऊनशिप आजवर म्हाडानं उभारलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टाऊनशिप असेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अंबरनाथ शहरात आत्तापर्यंत म्हाडाचा एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मात्र या परिसरात जी कनेक्टिव्हीटी आहे, त्यामुळं या भागाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. त्यामुळेच चिखलोली धरणाच्या बाजूला असलेली २०० एकर जागा खरेदी करण्याचा म्हाडाचा विचार आहे.
या जागेत आजवर म्हाडाकडून उभारण्यात आलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातली सर्वात मोठी टाऊनशिप उभारली जाणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंबरनाथ शहरात एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना त्यांनी ही माहिती दिली.
ज्या जागेवर हा प्रकल्प उभारण्याचा विचार आहे, त्या चिखलोलीच्या प्रस्तावित जागेचा आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आला. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन महाजन हे स्वतः उपस्थित होते. दरम्यान, या सर्वात मोठ्या टाऊनशिपसाठी जपानच्या शासकीय कंपनीसोबत बोलणी सुरू असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
प्रत्येक आपल्या कारकिर्दीत एखादा मोठा प्रकल्प व्हावा, अशी प्रत्येक मंत्र्याची इच्छा असते. त्यामुळं हा प्रकल्प झाला, तर एक वेगळा आनंद मिळणार असून पवार साहेबांचा विकासाचा दृष्टिकोन इथे कामाला येईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंबरनाथमध्ये ही टाऊनशिप झाली, तर ती शहराच्या विकासासाठी महत्त्त्वाची ठरेल.