Palghar School Opening update : मुंबई : ओमायक्रॉनच्या (Omicron)वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा (Maharashtra schools) बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार साधारण तीन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने बालवाडीपासून ते दहावीपर्यतच्या शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता पालघर जिल्ह्यातील शाळा (Palghar School Opening) २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश पालघर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने दिले आहेत. ८वी ते १२वी पर्यतच्या शाळा त्यामुळे सुरू होणार आहे. तर १ली ते ७वी पर्यतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय मात्र परिस्थितीनुरुप घेतला जाणार आहे. राज्यासह देशभरात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. देशाच्या विविध भागातदेखील निर्बंध लागू करण्यात आले होते. (Schools in Palghar district of Maharashtra to open from 27th January)
मात्र मागील काही दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या (Corona) घटू लागल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत. पालक आणि समाजाच्या विविध स्तरांमधूनदेखील शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
राज्यात विविध ठिकाणी १२ पर्यतचे वर्ग सुरू होणार असले तरी सर्वत्र सारखी परिस्थिती नसल्यामुळे स्थानिक प्रशासन यासंदर्भातील आढावा घेणार आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू करता येणार आहेत. तर ज्या ठिकाणी रुग्ण आढळत असतील तेथे परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळेच पालघर येथील शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पालघर जिल्ह्यात जवळपास ६५० शाळा असून त्यात ७२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. शाळा जरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असला तरी विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी पालकांची परवानगी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सरकारी शाळा सुरू होणार असून विविध संस्था चालवत असलेल्या शाळांबाबतचा निर्णय त्या संस्थाचालकांनाच घ्यावा लागणार आहे.
कोरोना स्थिती नियंत्रणात असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा, ज्युनिअर कॉलेज सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहेत. कोविड प्रोटोकॉल आणि मुंबई महापालिकेच्या कडक नियमांचे पालन करुन शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्रातील पहिली ते बारावी पर्यंतचे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून पुन्हा सुरू होत आहेत. स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी कोरोना संकट नियंत्रणात असेल तिथे प्रशासन शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेईल; अशी माहिती महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
शाळा सुरू करण्यासोबतच मुलांना शाळेत जबरदस्तीने बोलावू नये, असे आवाहनही महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांना केले आहे. मुलांना शाळेत नेण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती घेणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांना स्वेच्छेने शाळेत पाठवायचे असेल तरच त्यांना शाळेत येऊ द्यावे. याशिवाय शिक्षक आणि इतर शाळेतील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. यासोबतच १५ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्याची व्यवस्थाही शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शाळेत करावी. एवढेच नाही तर शाळा उघडण्यापूर्वी सर्व आवश्यक आणि खबरदारीची पावले उचलणे शाळा अधिकाऱ्यांना बंधनकारक असेल. त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे होत असलेल्या विविध निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थी मात्र सतत संभ्रमावस्थेत राहत आहेत.