Uddhav Thackeray: राज्यात सत्तांतर झाल्यावर शिंदे गट विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षावर दावा केला आहे. या सर्व प्रकरणाची आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. विजय आपलाच होईल, आई भवानीवर विश्वास आहे. कितीही अफझलखान आले तरी घाबरणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray gives big statement while hearing on real shiv sena going on in Supreme court read in marathi)
शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले असता त्यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर सुद्धा भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, आई भवानीचा आशीर्वाद असताना कोणी, कितीही अफझलखान आले तरी मला पर्वा नाही. दसऱ्याला तर आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झालेली आहे. कोर्टात सुनावणी सुरू आहे. माझा आई भवानीवर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे त्यामुळे न्याय आपल्याला मिळणार, मिळालाच पाहिजे.
हे पण वाचा : गेल्या जन्मात तुम्ही कोण होता? जाणून घ्या राशीनुसार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, तुळजाभवानीच्या दर्शनाला तर मी येणारच आहे. जिथे प्रतिनिधी घट्ट आहे तिथे शिवसैनिकही घट्ट राहणारच. तुम्ही येण्यापूर्वी जालनाकर इथे आले होते. जालन्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. ही परिस्थिती संपूर्ण राज्यभर आहे. ज्यांना तुम्ही सर्वांनी खस्ता खावून मोठे केले ते खोक्यात गेले.
हे पण वाचा : या पदार्थांमुळे हाडं होतात ठिसूळ
महाराष्ट्रातील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. 29 जूनला पक्षाने शिंदे गटाला अपात्र ठरवले पण सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली. एकनाथ शिंदे यांनी 29 जूननंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घडामोडींची सुरुवात 20 जून 2022 पासून झाली. शिंदे गट 19 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाकडे गेला आहे. यामुळे आधी आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय घ्यावा अशी आग्रही ठाकरे गटाचे वकील करत आहेत. आमदारांच्या अपात्रतेवर आधी निर्णय घ्यावा, नंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय घ्यावा ठाकरे गटाची मागणी आहे. तर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू असली तरी निवडणूक आयोगाला त्यांची सुनावणी आणि निर्णय घेऊ द्यावा अशी मागणी शिंदे गटाची आहे.