India vs Pakistan Cricket : Shahid Afridi remark about Gautam Gambhir sparks debate : भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मॅच म्हणजे मैदानात आणि मैदानाबाहेर असे दोन्हीकडे मोठे नाट्य सतत सुरू असते. आशिया कप २०२२ क्रिकेट स्पर्धेत रविवार २८ ऑगस्ट २०२२ रोजी भारत पाकिस्तान यांच्यात टी २० मॅच झाली. ही मॅच भारताने पाच विकेट राखून जिंकली. मॅच सुरू असताना भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये सलोख्याचे आणि मैत्रीचे वातावरण होते. पण कायम अशीच स्थिती असेल असे नाही. काही वर्षांपूर्वी भारतीय खेळाडू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्यात विस्तव जात नव्हता. या आठवणींना नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान मॅचच्या निमित्ताने पुन्हा उजाळा मिळाला.
कानपूर येथे २००७ मध्ये भारत-पाकिस्तान मॅच झाली. या मॅच दरम्यान पहिल्यांदा शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यात संघर्ष झाला. हा संघर्ष दीर्घ काळ क्रिकेटप्रेमींच्या चर्चेत कायम होता.
एरवी मैदानाबाहेर पडल्यावर मैदानातले शत्रुत्व विसरावे असे सांगतात. पण शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्या बाबतीत तसे झाले नाही. दोघांतील संघर्ष मैदानात आणि मैदानाबाहेर सर्वत्र सुरू असल्याचे दिसत होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण आफ्रिदी आणि गंभीर यांच्यातील संघर्ष सुरू राहिला.
पाकिस्तानमधील समा टीव्हीवर बोलताना शाहिद आफ्रिदीने गौतम गंभीर संदर्भातल्या आठवणंना उजाळा दिला. गौतम गंभीरचे त्याकाळात कोणाशीच पटत नव्हते. अगदी टीम इंडियातही त्याचे कोणत्याही खेळाडूशी जास्त पटत नव्हते, असे शाहिद आफ्रिदी म्हणाला. जेव्हा आफ्रिदी बोलत होता त्यावेळी कार्यक्रमात भारतातून हरभजन सिंह पण सहभागी झाला होता. शाहिदी आफ्रिदीच्या वक्तव्यावर तो काही बोलला नाही पण थोडं हसला. हरभजनच्या या प्रतिक्रियेवर भारतीय क्रिकेटप्रेमी नाराज झाले.
आफ्रिदीने गंभीरविषयी केलेल्या वक्तव्याचा सोशल मीडियातून समाचार घेणाऱ्या भारतीय क्रिकेटप्रेमींनी हरभजनने हसून दिलेल्या प्रतिक्रियेबाबतही नाराजी व्यक्त केली. आफ्रिदीच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविण्याऐवजी आणि हसून हरभजनने चूक केली असे मत अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केले. त्यांनी आफ्रिदीच्या वक्तव्यावर हरभजनने हसून दिलेल्या प्रतिक्रियेविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.