kl rahul says to reach in world test championship final we need to play aggressively : रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. आज म्हणजेच सोमवार 12 डिसेंबर 2022 रोजी केएल राहुल आणि बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन या दोघांच्या हस्ते भारत-बांगलादेश टेस्ट सीरिजच्या ट्रॉफीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना केएल राहुलने भारताच्या टेस्ट क्रिकेटमधील प्लॅनविषयी महत्त्वाची माहिती दिली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अर्थात WTC मध्ये सध्या ऑस्ट्रेलिया 75 टक्के गुणांसह पहिल्या, दक्षिण आफ्रिका 60 टक्के गुणांसह दुसऱ्या, श्रीलंका 53.33 टक्के गुणांसह तिसऱ्या आणि भारत 52.08 टक्के गुणांसह चौथ्या स्थानी आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दाखल होण्यासाठी आगामी सहा पैकी किमान पाच टेस्ट मॅच जिंकणे आवश्यक आहे.
भारत आता बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार टेस्ट मॅचची सीरिज खेळायची आहे. या सहा टेस्ट मॅच पैकी किमान पाच टेस्ट मॅच जिंकण्यासाठी भारताला आक्रमक पवित्रा घेऊन खेळावे लागेल. प्रत्येक सत्रात अर्थात सेशनमध्ये आक्रमक आणि प्रभावी खेळी करून प्रतिस्पर्ध्यावर वरचष्मा ठेवावा लागेल. प्रत्येक टेस्ट मॅच ही जिंकण्याच्याच उद्देशाने खेळून जिंकावी लागेल. प्रत्येक सेशन नंतर टीमला कामगिरीचा आढावा घेऊन लगेच चुका सुधाराव्या लागतील आणि चुकांची पुनरावृत्ती टाळावीच लागेल; असे केएल राहुल म्हणाला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच जून 2023 मध्ये लंडन येथे होणार आहे. याआधी भारताला कामगिरीत सुधारणा करावी लागेल, असे केएल राहुल म्हणाला. टेस्ट क्रिकेट हा पाच दिवसांचा खेळ आहे. यासाठी छोटी लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून ती साध्य करत पुढे प्रवास करावा लागतो. यातूनच विजय साध्य होतो. प्रत्येक सेशनमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन नवे डावपेच आखणे आणि त्यांची प्रभावीरित्या अमलबजावणी करणे आवश्यक असते. टीम इंडियाचे खेळाडू यासाठी समर्थ आहेत. ते हे करू शकतील असा विश्वास केएल राहुलने व्यक्त केला. टी 20, वन डे आणि टेस्ट या तिन्ही प्रकारांपैकी टेस्ट क्रिकेट हा संयमाचा आणि फिटनेसची परीक्षा बघणारा प्रकार आहे. पण या प्रकारात आम्ही प्रभावी कामगिरी करू असाही विश्वास केएल राहुलने व्यक्त केला. त्याने टीम इंडियाचे खेळाडू हुशार आहेत आणि व्यवस्थित खेळत आहेत, असे सांगितले. खेळाडूंचे केएल राहुलने ठामपणे समर्थन केले.
हुश्श, भारत तिसरी वन डे जिंकला, बांगलादेशचा दारुण पराभव